कोल्हापूर : तमनाकवाडा (ता. कागल) येथील पाझर तलाव प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना 1 कोटी रुपयांची भरपाई देण्यात आली. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांच्या हस्ते हे वाटप झाले. ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच दत्तात्रय गुंडू चव्हाण होते.
यावेळी शेतकऱ्यांच्या वतीने सुभाष लांडगे विजय चौगुले व इतर शेतकरी यांच्या हस्ते श्री मुश्रीफ, सरपंच श्री चव्हाण यांचा सत्कार झाला. भाषणात नवीद मुश्रीफ म्हणाले, साडेतीन कोटी रुपये निधी खर्चून बांधलेल्या पाझर तलावामुळे दीडशे एकरहून अधिक एकर जमिनीला अप्रत्यक्षरीत्या लाभ होणार आहे.
श्री चव्हाण म्हणाले, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोरडवाहू गावाला तलाव मंजूर करून केवळ एक वर्षात प्रकल्प पूर्ण केला. तसेच संपादित केलेल्या जमिनीची भरपाईही शेतकऱ्यांना एक वर्षाच्या आत मिळवून देऊन त्यांनी शब्द खरा केला. पुणे प्रादेशिक जलसंधारण अधिकारी यशवंत भोसले यांचेही योगदान मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी सुभाष लांडगे, संजय चौगले, अभिजित चव्हाण व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. तसेच जलसंधारण विभागाचे श्री साठे व श्री नेसरीकर हे उपस्थित होते.