मंचर -लॉकडाऊन काळातील वीजबिले सरकारने माफ करावीत, असे सांगत आंबेगाव तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लांडेवाडी आणि शिंगवे गावांत सोमवार (दि. 13) चुकीच्या पद्धतीने आलेल्या वीजबिलांची होळी केली.
याबाबत देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लॉकडाऊन झाले तेव्हापासून आजपर्यंत असलेली वीज बिले आणि पुढील तीन महिन्यांत येणारी वीजबिले सरकारने माफ करावीत. लॉकडाऊन काळात उद्योग, व्यवसाय, नोकरदार, शेतकरी यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. बंदमुळे सर्वसामान्य जनतेला उत्पन्नाचे साधन नसल्याने वीज ग्राहकांनी वीज बिले भरलेली नाहीत.
अजूनही अर्थव्यवस्था सुरळीत नसल्याने वीज बिल माफीबाबतचे निवेदन आंबेगाव तालुक्याच्या तहसीलदार कार्यालयाला ई-मेलद्वारे पाठविण्यात आल्याची माहिती आंबेगाव तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी दिली.
आंबेगाव तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वीजबिलांची शिंगवे, लांडेवाडी गावी होळी करण्यात आली. यावेळी सुनील वाव्हळ, वनाजी बांगर, कुसुम शेवाळे, संतोष पोखरकर, सुहास सैद आदी कार्यकर्ते उपस्थित होते.