हवा प्रदूषणाबाबत एका नवीन विक्रमाची नोंद
लॉकडाऊन काळात शहरातील हवेची गुणवत्ता “उत्तम’
– गायत्री वाजपेयी
पुणे – एरव्ही हवा प्रदूषणाच्या सावटात राहणारे पुणेकर गेल्या चार महिन्यांपासून शुद्ध आणि मोकळ्या हवेत श्वास घेत आहेत. शहरातील हवेची गुणवत्ता “उत्तम’ असल्याची नोंद झाली आहे, असे निरीक्षण नोंदविण्यात आले.
लॉकडाऊनमुळे रस्त्यांवरील वाहनांची गर्दी कमी झाली आहे. त्यामुळे मार्चपासून जूनपर्यंतच्या चार महिन्यांमध्ये पुण्यातील प्रदूषणाची पातळी कमी झाली. त्यामुळे देशातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत “टॉप टेन’मध्ये असलेले पुणे आता मोकळा श्वास घेत आहे.
शहराने यंदा सर्वाधिक शुद्ध हवेचा विक्रम नोंदविला. गेल्या चार महिन्यांपासून शहरातील हवेची गुणवत्ता “उत्तम’ असून, हा आतापर्यंतचा सर्वाधिक काळ असल्याचे मत अभ्यासकांनी नोंदविले.
संचारबंदीमुळे बांधकामेही बंद होती. रस्त्यावर वाहने नसल्याने रस्त्याच्या कडेची धूळ उडत नव्हती. त्यामुळे हरित वायू उत्सर्जन होत नव्हतेच, तसेच हवेत तरंगणाऱ्या सुक्ष्म धुलीकणांचे प्रमाणही अत्यल्प नोंदले गेले. त्यामुळे शहरातील हवा या काळात मोकळी होती, असे निरीक्षण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) आणि आयआयटीएम-सफर या संस्थांनी नोंदविले आहे.
लॉकडाऊन नियम शिथिल झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात नागरिक घराबाहेर पडले. त्यामुळे वाहनांची वर्दळ वाढल्याने हवेतील प्रदूषकांच्या प्रमाणातही वाढ झाली. अनलॉक काळात प्रदूषकांचे प्रमाण 5 टक्क्यांनी वाढल्याची नोंद “सफर’ या संस्थेने केली. मात्र, या काळात पाऊस पडला. त्यामुळे हवेतील प्रदूषके पाण्यात विरघळली.
सामान्यपणे हवेतील प्रदूषकांची प्रमाण मर्यादा 80 क्युबिक घनमीटर इतकी असते. मात्र, अनेकदा हवेतील प्रदूषणाची पातळी मार्यादेपेक्षा अधिक म्हणजे 100 हून अधिक असून प्रदूषणाचा तीन अंकी आकडा गाठत असते. परंतु, लॉकडाऊन काळात हे प्रमाण न केवळ कमी झाले, तर प्रदूषण पातळीचे प्रमाण एक अंकी इतके कमी झाल्याची नोंद राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे झाली. प्रदूषणाबाबतीत हा ही एक वेगळा रेकॉर्ड मानला जात आहे.