नगर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या पंचवार्षिक काळात योजलेल्या सर्वसामान्यांच्या योजनांचा देशातील जनतेला फायदा झाला आहे. जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी त्या योजना तळागळापर्यंत पोहचविण्याचे काम करावे. नगर जिल्ह्यात भाजपाचे काम चांगले सुरु असून, पदाधिकाऱ्यांनी संघटनात्मक कामात स्वत:ला झोकून देऊन काम केल्यास नगर जिल्ह्याला कोणीही मागे टाकू शकणार नाही.
सध्याच्या करोनाच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे वरिष्ठ पदाधिकारी राज्यभर फिरुन आढावा घेत आहेत. जिल्हास्तरावरही ते करावे. राज्य सरकारने अनेक घोषणा केल्या आहेत, परंतु त्याची अंमलबजावणी होतांना दिसत नाही, असे भाजपच्या प्रदेश सरचिटणीस आमदार देवयानी फरांदे यांनी म्हटले आहे.
भाजपच्या नगर जिल्हा कार्यकारिणीचा आढावा बैठक प्रदेश सरचिटणीस आ. देवायनी फरांदे यांनी घेतली यावेळी ते बोलत होत्या. यावेळी जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, प्रा.भानुदास बेरड, ऍड.अभय आगरकर, प्रसाद ढोकरीकर, दिलीप भालसिंग, युवराज पोटे, बाळासाहेब महाडिक, संतोष लगड, सुवेंद्र गांधी, अजय काशिद, मनोज कोकाटे, अमोल भनगडे, वसंत चेडे आदी उपस्थित होते.जिल्हाध्यक्ष मुंडे यांनी आ.देवायनी फरांदे यांना जिल्ह्यातील संघटनेचा आढावा सादर केला. तसेच पक्ष वाढीसाठी सुरु असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे जिल्ह्यात होण्यासाठी पक्षाचे पदाधिकारी कार्यरत असंल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे राज्य सरकारच्या फसव्या कर्जमाफीबाबत जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी राज्य सरकारचा निषेध करुन कर्जमाफीसाठी आंदोलने केल्याचे निदर्शनास आणून दिले. लवकरच पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त करुन पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले जातील, असे सांगितले.
ढोकरीकर यांनी पक्षाच्या वतीने सुरु असलेल्या संघटनात्मक कामाचा आढावा सादर केला. तसेच जिल्ह्यातील फसवी कर्ज माफीबाबत पदाधिकाऱ्यांनी बाबत जाब विचारावा असे फरांदे यांनी सांगितले.