लखनौ : करोनामुळे लागू केलेला लॉकडाऊन शिथिल करताच सुधारित नागरिकत्व कायद्याच्या (का) विरोधातील आंदोलनात सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांच्या मालमत्ता गोठवण्यास उत्तर प्रदेश सरकारने सुरवात केली आहे. हसनगंज भागातील दोन मालमत्ता मंगळवारी गोठवण्यात आल्या आहेत.
चार पोलिस ठाण्यातील 54 जणांवर मालमत्तेचे नुकसान केल्याचे गुन्हे दाखल असून त्यांच्या मालमत्ता जप्त करण्याबाबतच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत. त्यापैकी दोन हसनगंज भागातील असून त्या गोठवल्या आहेत. ही प्रक्रिया या पुढेही सुरू राहील, असे तहसीलदार शंभूचरणसिंग यांनी बुधवारी सांगितले.
महेनूर चौधरी आणि धरमवीर सिंह यांची दोन दुकाने जप्त करण्यात आली आहेत. काविरोधी आंदोलनात मालमत्तेचे नुकसान केल्याचा या दोघांवर आरोप होता. उत्तर प्रदेशने सार्वजनिक आणि खासगी मालमत्ता नुकसानभरपाई वटहुकूम 2020 नुसार ही कारवाई सुरू करण्यात आल्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी विश्वभूषण मिश्रा यांनी सांगितले.
का आणि एनआरसीच्या विरोधात शहरात 19 डिसेंबरला हिंसाचार उफाळला होता. त्यात कोट्यवधी रुपयांच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले होते. या 54 जणांना एक कोटी 55 लाख रुपयांच्या भरपाईची नोटीस बजावण्यात आली आहे. तर खांद्रा क्षेत्रात 13 निदर्शकांकडून 21.76 लाख रुपयांची नुकसान भरपाईचे आदेश दिले आहेत. परिवर्तन चौकात 24 जणांवर 69.65 लाख रुपयांच्या वसूलीची निश्चिती करण्यात आली आहे.