पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) निकालाच्या कामकाजासाठी संबंधित एजन्सीचे कर्मचारी अद्याप कार्यालयात हजर झालेले नाहीत. त्यामुळे या परीक्षेचा निकाल आणखी लांबणीवर पडू लागलेला आहे.
राज्यात 19 जानेवारीला “टीईटी’ परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी 3 लाख 43 हजार 283 उमेदवारांनी नोंदणी केली होती. यात पेपर क्रमांक 1 साठी 1 लाख 88 हजार 687 तर पेपर क्रमांक 2 साठी 1 लाख 54 हजार 596 जणांनी नोंदणी केली होती.
या परीक्षेच्या कामकाजासाठी बड्या खासगीकडे काम सोपविण्यात आले होते. या एजन्सीचे कर्मचारी जिल्ह्याबाहेरील आहेत. करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने हे सर्व कर्मचारी लॉकडाऊन पूर्वीच आपआपल्या गावी निघून गेले आहेत. आता परत येण्यासाठी वाहतुक सुविधा उपलब्ध झालेली आहे. मात्र या कर्मचाऱ्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था होत नसल्याने ते अद्याप पुण्यात येऊ शकले नाहीत.