घाऊक बाजारात क्विंटलच्या दरात 500 रुपयाची वाढ
पुणे – करोनामुळे बाहेरचे व्यापारी तूरडाळीच्या खरेदीसाठी शहरात येण्यास टाळाटाळ करीत आहेत. नेहमीच्या तुलनेत ग्राहकांकडून केवळ 15 ते 20 टक्केच मागणी आहे. तरीही भाव तेजीत आहेत. किरकोळ बाजारात किलोच्या भावाने शंभरी गाठली आहे. तर, घाऊक बाजारात आठवडाभरात क्विंटलच्या भावात 500 रुपयांनी वाढ झाल्याची माहिती व्यापारी नितीन नहार यांनी मंगळवारी दिली.
घाऊक बाजारात क्विंटलचा भाव 8,150 ते 8,800 रुपये आहे. घाऊक आणि किरकोळ बाजारात मागणी नसल्याने व्यापारी गरजेनुसार तूरडाळ मागवत आहेत. ग्राहकांकडून मागणी वाढल्यास तसेच व्यापाऱ्यांनी खरेदी सुरू केल्यानंतर तूरडाळीच्या भावात वाढ होणार असल्याचा अंदाजही नहार यांनी व्यक्त केला.
बाजारात लातूर, नांदेड, बार्शी, सोलापूर येथून तूरडाळीची आवक होते. इतरवेळी रोज 50 टनांपेक्षा अधिक आवक होते. मात्र, ग्राहकांअभावी मागणी घटल्याने व्यापारी कमी प्रमाणात तूरडाळ मागवत आहेत.