मंचर, दि. 30 (प्रतिनिधी) – मंचर (ता. आंबेगाव) येथील दुकाने बुधवार (दि. 1) पासून पुढील काही दिवसांसाठी दुपारी तीननंतर बंद ठेवण्यात येणार आहेत. करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. दुकानदारांनी सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच दत्ता गांजाळे यांनी केले आहे.
करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. स्थानिक नागरिकांनाही आता ही लक्षणे जाणवत आहेत, तसेच अनेक रुग्ण मंचर शहरात वैद्यकीय उपचारासाठी किंवा काही खरेदीसाठी येऊन गेले असल्याचे लक्षात आले आहे, असे सांगून सरपंच दत्ता गांजाळे म्हणाले, खबरदारीचा उपाय म्हणून मंचर शहरातील सर्व दुकानांची वेळ बुधवारपासुन पुढील काही दिवस दुपारी तीन वाजेपर्यंत केली आहे. दुपारी 3 नंतर सर्व व्यवहार बंद (ऐच्छिक) राहतील.
या निर्णयाची कुणावरही सक्ती केली जाणार नाही. ज्यांना हा निर्णय मान्य नसेल, त्यांनी आपली दुकाने उघडी ठेवावी. व्यवसाय करताना सरकारने घालून दिलेल्या नियमांचे संपूर्णपणे पालन करावयाचे आहे. काही बाबींमध्ये त्रुटी आढळल्यास अथवा नियम पाळत नाही, असे दिसल्यास या दुकानांवर दंडात्मक किंवा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, व्यापारी बांधवांचे हित लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आल्याचे सरपंच दत्ता गांजाळे यांनी स्पष्ट केले आहे.