पोलीस बंदोबस्तात आज होणार मार्गस्थ : फक्त 20 वारकऱ्यांचा समावेश
देहूगाव – आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांच्या पादुका शासनाने पाठविलेल्या “विठाई’ बसने मंगळवारी (दि.30) दुपारी पोलीस बंदोबस्तात श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या विश्वस्तांसह 20 सेवेकरी मार्गस्थ होणार आहेत.
पादुकांसोबत पालखी सोहळा प्रमुख विशाल महाराज मोरे, माणिक महाराज मोरे, संतोष महाराज मोरे व संस्थानचे अध्यक्ष मधुकर महाराज मोरे, विश्वस्थ संजय महाराज मोरे, अजित महाराज मोरे यांच्यासह
14 सेवेकरी जाणार आहेत.
करोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने श्री संत तुकाराम महाराजांच्या 335 व्या पायी आषाढीवारी पालखी सोहळा रद्द केला आहे. श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दि.12 जून रोजी मोजक्याच लोकांमध्ये प्रस्थान सोहळा झाला होता. त्यानंतर श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुका येथील भजनी मंडपात ठेवल्या होत्या. भजनी मंडपातच वारीतील नित्य पूजा, भजन, कीर्तन व हरिपाठ हे नियमित उपक्रम पार पाडण्यात आले. शिवाय, प्रतिकात्मक गोल रिंगण सोहळादेखील झाला. इंद्रायणीतच पादुकांचा नीरा स्नान सोहळाही झाला.
पालखी सोहळ्याच्या नियमानुसार पालखी दशमीच्या दिवशी सर्व संतांच्या पालख्या पंढरपूरमध्ये दाखल होत असतात. नियोजनानुसार, दि.30 जून दशमीच्या दिवशी श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांसह श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत निवृत्ती महाराज, श्री संत सोपानकाका महाराज, श्री संत मुक्ताबाई, श्री संत चांगदेव महाराज, श्री संत एकनाथ महाराज, श्री संत नामदेव महाराज, श्री संत निळोबाराय महाराजांच्या पादुका आदी संतांच्या पादुका वाखरी पालखी मुक्काम तळावर येतील. येथे आरती होईल व पादुका शासनाच्या नियोजनाप्रमाणे शासकीय क्रमाने पंढरपुरात रात्री 11 वाजेपर्यंत पोहोचणार आहेत, असे सांगण्यात आले.
देहूत प्रवेश करणारे सर्व मार्ग बंद
श्री क्षेत्र देहूगावमध्ये वारकऱ्यांनी येऊ नये व गर्दी करू नये, यासाठी देहूत प्रवेश करणारे सर्व मार्ग बंद केले आहेत. गावात कोणत्याही प्रकारच्या जड वाहनांना पालखीसोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ होईपर्यंत प्रवेश देण्यात येणार नाही.