कोलोंबो – श्रीलंकेत, गेल्या दोन महिन्यांपासून सामुदायिक संक्रमणाचे कोणतेही उदाहरण मिळालेले नाही. त्यामुळे कोविडच्या उद्रेकानंतर लागू केलेली संचारबंदी पूर्णपणे काढून टाकण्यात आली आहे.
यापूर्वी 20 मार्चपासून संपूर्ण देशावरील लागू असलेली संचारबंदी देशातील स्थिती सर्वसमान्य झाल्यानंतर अर्धवट हटविण्यात आली आहे.
दररोज मध्यरात्री 12 ते पहाटे 4 पर्यंत संचारबंदी लागू होती. ती आजपासून उठविण्यात आली आहे. श्रीलंकेतील करोनाच्या स्थितीमध्ये झपाट्याने सुधारणा होत आहे. कोविडच्या अवघ्या 361 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
श्रीलंकेत 2,033 जणांना करोनाचा संसर्ग झाला असून त्यापैकी करोनामुक्त झालेल्य रुग्णांची संख्या 1,661 इतकी आहे. तर केवळ 11 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या दोन महिन्यात नौदलाच्या तळावर सुमारे 1 हजार रुग्ण श्रीलंकेत सापडले आहेत. तर अलिकडे सापडलेले रुग्णांपैकी बहुतेक जण विदेशातून परतलेले प्रवासी आहेत.
दरम्यान विदेशातून श्रीलंकेत परत येणाऱ्यांची नोंदणी अधिक प्रमाणात झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानतळ पूर्णपणे उघडण्यास विलंब लागू शकतो, असे नागरी विमान वाहतुक मंत्री प्रसन्न रणतुंगा यांनी सांगितले. यापूर्वी सरकारने पर्यटकांसाठी 1 ऑगस्टपासून विमानतळ पुन्हा सुरू करण्याचे लक्ष्य ठेवले होते. मात्र आता विमानतळ संपूर्णपणे पुन्हा उघडणे 15 ऑगस्टनंतर किंवा ऑगस्टच्या शेवटी केले जाऊ शकते.