५६ लाख ६० हजार ५५० क्विंटल अन्नधान्याचे वाटप – मंत्री छगन भुजबळ यांची माहिती
मुंबई :- राज्यातील 52 हजार 440 स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरू आहे 1 जून ते 26 जूनपर्यंत राज्यातील 1 कोटी 36 लाख 60 हजार 776 शिधापत्रिका धारकांना 56 लाख 60 हजार 550 क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले तसेच 26 लाख 78 हजार 155 शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे 7 कोटी आहे. या लाभार्थ्यांना 52 हजार 440 स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. राज्यात या योजनेमधून सुमारे 18 लाख 65 हजार 612 क्विंटल गहू, 14 लाख 28 हजार 20 क्विंटल तांदूळ, तर 19 हजार 750 क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्थलांतरित झालेले परंतु लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेल्या सुमारे 3 लाख 38 हजार 878 शिधापत्रिका धारकांनी ते जेथे राहत आहे त्याठिकाणी शासनाच्या पोर्टबिलीटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत एप्रिल ते जूनपर्यंत प्रतिलाभार्थी प्रतिमहिना 5 किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. दि. 1 जूनपासून एकूण 85 लाख 76 हजार 843 रेशनकार्ड ला मोफत तांदूळ वाटप केले आहे. या रेशनकार्ड वरील 3 कोटी 87 लाख 28 हजार 704 लोकसंख्येला 19 लाख 36 हजार 440 क्विंटल तांदळाचे वाटप झाले आहे.
राज्य शासनाने कोविड-19 संकटावरील उपाययोजनेसाठी 3 कोटी 8 लाख 44 हजार 076 एपीएल केसरी लाभार्थ्यांना मे व जून 2020 या 2 महिन्यासाठी प्रति व्यक्ती 5 किलो धान्य सवलतीच्या दराने (गहू 8 रुपये प्रति किलो व तांदूळ 12 रुपये प्रति किलो) देण्याचा निर्णय घेतला आहे. या धान्याचे जून 2020 मध्ये आतापर्यंत 3 लाख 72 हजार 40 क्विंटल वाटप केले आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेत प्रति रेशनकार्ड 1 किलो मोफत डाळ (तूर किंवा चणा डाळ) देण्याची तरतूद आहे. या योजनेतून सुमारे 2 लाख 45 हजार 771 क्विंटल डाळीचे वाटप केले आहे.
आत्मनिर्भर भारत या योजनेचा अन्नधान्य लाभ मे व जून 2020 या 2 महिन्यासाठी असून त्या अंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट नसलेल्या विनाशिधापत्रिका धारकांना प्रती व्यक्ती 5 किलो मोफत तांदूळ दिला जात आहे. आतापर्यंत 58 हजार 440 क्विंटल मोफत तांदूळ वितरित केला आहे.
राज्यात 1 जून ते 26 जून पर्यंत 851 शिवभोजन केंद्रातून पाच रूपये प्रति थाळी याप्रमाणे 26 लाख 78 हजार 155 शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले आहे. तसेच एप्रिल ते जून या कालावधीत 84 लाख 61 हजार 932 शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले आहे.
राज्यातील स्वस्त धान्य दुकानांतून सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या अन्नधान्याचे वाटप सुव्यवस्थितरित्या होत असल्याबाबत संनियंत्रण करण्यात येत असून, काळाबाजार करणाऱ्या स्वस्त धान्य दुकानदारांवर कारवाई करण्यात येत आहे.