देशातील आठ समृद्ध राज्यांना करोनाचा फटका बसणार आहे. सगळ्याच राज्यांचे दरडोई उत्पन्न कमी होणार आहे. मात्र, औद्योगिकदृष्ट्या जी राज्ये पुढारली आहेत, त्यांना याची जास्त झळ पोहोचणार आहे. याचे कारण करोनाने तीन महिने सगळ्यांना लॉकडाऊन केले होते. या काळात बरीच उलथापालथ झाली. व्यवहार ठप्प झाले. देवाण- घेवाण रोखली गेली. जी काही थोडीबहुत झाली ती खिजगणतीतही न धरावी अशी होती. जेव्हा असे व्यवहार थांबतात तेव्हा त्यामुळे सगळी शृंखलाच मोडली जाते. वर्तुळ पूर्ण होत नाही. त्यामुळे त्याचा फटका सगळ्यांना बसतो व तो सहनही करावा लागतो. मागणी कमी होते, त्यामुळे पुरवठ्याच्या चेनला झटका बसतो. ते उत्पादन कमी करतात. त्यामुळे निर्मितीच्या प्रक्रियेला फटका बसतो. त्यात गुंतलेल्यांना मग कमी केले जाते. त्याचा त्यांच्यावर आणि त्यांच्या क्रयशक्तीवर परिणाम होतो.
थोडक्यात, साखळी एकसंध राहिली पाहिजे. एकजरी कडी निसटली की सगळे आवाक्याबाहेर जाते. हे सगळे सांगायचे कारण म्हणजे स्टेट बॅंकेचा अहवाल. लॉकडाऊनचा अर्थकारणावर झालेल्या परिणामाचे संशोधन करण्यात आले आहे. त्याचा निष्कर्ष या अहवालात मांडण्यात आला आहे. त्यानुसार राज्यांचे दरडोई उत्पन्न घटणार, अशी पुस्तकी ओळ त्यातून ठळकपणे दिसते. कोणत्या राज्याचे दरडोई उत्पन्न किती घटणार याची टक्केवारी यात मांडली गेली आहे. या अहवालातच महाराष्ट्र आदी प्रगत राज्यांचे नुकसान अधिक असणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
अर्थकारण, घसरण, दरडोई उत्पन्न हा शब्दजंजाळ आहे. त्याचा एका वाक्यात जो अर्थ काढता येतो तो अगदी सोपा आहे. तो म्हणजे पुढचे काही महिने अवघड स्थिती आहे. करोनाच्या खड्ड्यातून वर्षभर तरी सावरणे कठीण आहे. सधन किंवा श्रीमंत वर्ग तरून जाईल. अर्थात, त्यांचेही नुकसान होणारच आहे. उच्च, मध्यमवर्गालाही आपल्या काही गरजा कमी कराव्या लागतील. म्हणजे त्यांनाही स्वत:हून कपात करून घ्यावी लागेल.
मात्र, सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे मध्यमवर्ग आणि गरीब वर्गाला याची सर्वाधिक झळ पोहोचणार आहे. तसे अहवालातून सूचित होते आहे. गरिबीच्या रेषेच्या वर जे लोक आलेत किंवा त्यासाठी प्रयत्नशील होते, त्यांना नव्याने सुरुवात करावी लागणार आहे. मध्यमवर्गाला आर्थिक झळ आहेच. पण त्याहीपेक्षा त्यांना स्वाभिमानाने जगता येण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागणार आहे. करोनाची व्यापकता आता केवळ आजारापुरती मर्यादित राहिलेली नाही. आर्थिक परिघातही त्याने प्रवेश केला आहे. हजारो लोकांना त्याची बाधा झाली आहे. त्याने आपले भय प्रस्थापित केले आहे. त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग आहेत. ते काढलेही जात आहेत.
मात्र, संकट पूर्ण संपण्याचा कालावधी निश्चित नाही. तसे काही होण्याची पुसटशीही शक्यता अद्याप दिसत नाही. त्यामुळे प्राणाचे भय आहेच. त्याहीपेक्षा नैराश्यात जाण्याचे अधिक आहे. बऱ्याच लोकांना जीव गमवावाही लागला आहे. यथावकाश किंवा लॉकडाऊनचा अंक झाल्यावर अनलॉकचा अंक सुरूही झाला आहे. मात्र, वर्दळ वाढताना दिसत नाही. रस्त्यावर गर्दी दिसतेय. मात्र, ती दुकानदारांसाठी किंवा विक्रेत्यांसाठी पुरेशी नाही. त्यातून त्यांना ग्राहक मिळत नाही.
जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी होतेय. इतर ठिकाणी अजूनही सन्नाटा आहे. लोक अजूनही करोनाच्या भयाने चाचरताहेत की खर्चाला लगाम घालत आहेत? लगामच घालण्याचा प्रयत्न आहे की, ऐपतच संपली आहे? प्रश्न आहेत. त्यांची उत्तरेही आहेत. मात्र, त्यावर विचार करून योग्य ठिकाणी चिकित्सा होणे आता आवश्यक आहे. अनेक रोजगार गेले आहेत. छोटे मोठे व्यवसाय ठप्प आहेत. काही सुरू करायचे म्हटले तर अगोदरच धाडस होत नाही. करायला गेले तर कोणीतरी सबुरीचा सल्ला देऊन मनात संशयाची पाल सोडते. या अशा संभ्रमाच्या वातावरणात सगळे करोनार्पण. आणखी एक दिवस पुढे ढकलला अशीच दररोजची स्थिती.
नोटाबंदीच्या काळात सुरुवातीचे काही दिवस अशीच स्थिती होती. काही ठिकाणी रांगा लागल्या. ज्यांच्याकडे लपवण्यासारखे काही होते, त्यांची काही दिवस पळापळ झाली. एकदा त्यांचे हात मोकळे झाल्यावर तेही निवांत झाले. मोठ्या उलाढाली नसलेल्यांना त्याचे फार सोयरसुतक नव्हते. बाजारपेठ काहीशी मंदावली तरी प्राणाचे भय नव्हते. लढण्याची उमेद होती. त्यामुळे लोक घरात बसून नव्हते. कृतीशील होते व गर्तेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न बऱ्यापैकी यशस्वी झाला. आताची स्थिती त्यापेक्षा भिन्न आहे. बाहेर पडणे धोकादायक आणि घरातच बसणे नैराश्याच्या गर्तेत लोटणारे. लहानसहान व्यवसाय करून चरितार्थ चालवणाऱ्यांवर सगळ्यात अगोदर कुऱ्हाड कोसळली.
निराशेचा अंधार गडद होताना दिसल्यावर सन्मानाने जगातून जाण्याचा विचार लोकांच्या मनाला शिवला. यातून आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढीस लागल्याचे दिसते. समृद्ध महाराष्ट्राच्या पुण्यासारख्या पुढारलेल्या शहराचेच बघा. गेल्या काही दिवसांत आत्मघाताच्या घटना रोज घडताहेत. जिद्द आणि उमेद असली की संकटावर मात करण्याचा प्रयत्न करता येतो. त्यात यशही मिळते. आहे ही स्थिती कायम राहणार नाही व नसेलही. मात्र, ती उमेदच कुठेतरी हरवली आहे. जून महिना हा खऱ्या अर्थाने आर्थिक वर्ष सुरू होण्याचा काळ. शाळा सुरू होतात. त्याचसोबत पालकांची धावपळ, खरेदी, दुकानदारांची लगबग, अन्य व्यावसायिकांची तारांबळ हे सगळे दिसू लागते. थोडी ओढाताण होते.
मात्र, हाच रोजगाराचा अथवा अर्थार्जनाचा काळ असतो. काही व्यवसायांत अख्खे कुटुंब एकाच दुकानात सक्रिय झाल्याचे दिसते ते याच काळात. यंदा सगळेच थंडावले आहे. ना पुस्तके, ना दप्तर, ना रेनकोट खरेदी. सगळेच ऑनलाइन. पूर्ववत कधी होणार याचे उत्तर कोणाकडेच नाही. सरकारने अनलॉक केले. पॅकेजही भलेमोठे जाहीर केले. गरिबांना हमखास रोजगार देण्याची योजनाही आणली. त्याचे उद्घाटनही झाले. मात्र, त्याचे दृश्य परिणाम अद्याप नाहीत. स्थलांतरितांच्या प्रश्नावरही काम झाले. मात्र, शहरी भागातला मध्यमवर्ग अजूनही बुजलेलाच, घाबरलेलाच आहे. तो अशा चौकात उभा आहे की कुठे जावे याची वाट त्याला सापडत नाही. त्यामुळे तो नाउमेद होत चालला आहे. कमी पैशात जास्त श्रम करण्याची तयारीही ठेवली तरी संधी मिळणेच एक संधी झाली आहे. कारण जो संधी देण्यास सक्षम होता अथवा आहे, तो सध्या स्वत:ला बाचवण्याच्याच खटपटीत व्यस्त आहे.
करोनाने त्यालाही घायाळ केले आहे. दोन-चार महिन्यांच्या विषाणूने अवघ्या जगाला गुडघे टेकण्यास बाध्य केले आहे. सगळीकडून नकारघंटा ऐकू येण्याचाच हा काळ असला तरी नाउमेद होऊन थांबता येणार नाही. ना सरकारला ना व्यक्तीला.