नवी दिल्ली : भारत आणि चीन यांच्यात मागील आठवड्यात नियंत्रण रेषेजवळ हिंसा झाली होती. त्यानंतर नियंत्रण रेषेवर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र या वातावरणावर आता पडदा पडला आल्याचे दिसत आहे. कारण भारत आणि चीनमध्ये निर्माण झालेली संघर्षाची स्थिती निवळण्याचे संकेत मिळत आहेत.
चीनच्या हद्दीतील चुशुल-मोल्डो येथे दोन्ही देशांच्या वरिष्ठ सैन्य अधिकाऱ्यांमध्ये काल उच्चस्तरीय बैठक झाली. या चर्चेमध्ये नियंत्रण रेषेवर निर्माण झालेला तणाव कमी करण्यावर दोन्ही देशाच्या सैन्य अधिकाऱ्यांमध्ये एकमत झाले. गलवान खोऱ्यातील संघर्ष तसेच अन्य वादांच्या मुद्दावर या बैठकीत चर्चा झाली. चांगल्या, सकारात्मक वातावरणात ही चर्चा झाली असल्याचे एका इंग्रजी वृत्तवाहिनीने म्हटले आहे. पूर्व लडाखमधील संघर्षाची स्थिती असलेल्या सर्व भागांमधून तणाव कमी करण्यासंबंधी या बैठकीत चर्चा झाली. लेफ्टनंट जनरल पदाचे अधिकारी या बैठकीत सहभागी झाले होते.
मागच्यावेळी सहा जून रोजी लेफ्टनंट जनरल पदावरील लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली होती. त्यावेळी सुद्धा तणाव कमी करण्यावर एकमत झाले होते. दोन्ही बाजूचे सैन्य हळू-हळू जात होते. पण १५ जून रोजी चीनने धोका दिला व पेट्रोलिंग पॉईंट १४ जवळ चौकी उभारण्याचा प्रत्यत्न केला. त्या रात्री झालेल्या रक्तरंजित संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले तर चीनचे ४० पेक्षा जास्त सैनिक ठार झाले. १९६७ नंतर प्रथमच असा हिंसक संघर्ष झाला.
दरम्यान,लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे दोन दिवसाच्या लडाख दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. मंगळवार आणि बुधवार असे दोन दिवस ते लडाखमध्ये असतील. या दौऱ्याच्यावेळी ते गलवान खोऱ्यामध्ये जाऊन तिथल्या कमांडर्सकडून परिस्थिती जाणून घेतील. सहा आठवडयांपासून पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ तणावाची स्थिती आहे. भारत आणि चीन दोन्ही देशांचे सैनिक आमने-सामने उभे ठाकले आहेत. नियंत्रण रेषेजवळील फॉरवर्ड लोकेशन्सवर जाऊन तिथे तैनात असलेल्या सैनिकांबरोबर लष्करप्रमुख संवाद साधतील व त्यांच्याकडून परिस्थिती जाणून घेतील लष्करातील सूत्रांनी एका वृत्तवाहिनीला ही माहिती दिली.