नवी दिल्ली : जम्मू काश्मिरमधून चार ते पाच अतिरेक्यांचा एक गट राजधानीत घुसला असून ते मोठा दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती गुप्तचर खात्याने दिली आहे. त्यामुळे दिली पोलिसांना हाय अलर्ट दिला आहे. या दहशतवाद्यांकडे बॉम्बचा मोठा साठा असल्याची माहिती गुप्तचर खात्याच्या हाती लागली आहे.
दहशतवादी लपण्याच्या जागांचा पोलिसांनी कसोशिने शोध सुरू केला आहे. हाती आलेल्या महितीनुसार आणखी काही दहशतवादी दिल्लीत घुसण्याच्या तयारीत आहेत. दिल्ली पोलिसांनी सर्व लॉज, हॉटेल आणि गेस्ट हाऊसवर छापे घालण्यास सुरवात केली असून जम्मू काश्मिर पासिंगच्या सर्व वाहनांची कडक तपासणी सुरू केली आहे. राजधानीतील सर्व बस स्टॅंड आणि रेल्वे स्थानकाकर अती सतर्कता बाळगण्यात येत आहे.
बाजारपेठा आणि रुग्णालयांवर विशेष देखरेख ठेवण्यात येत असून सध्या रुग्णांची संख्या वाढली असल्याने तेथे अतिरेकी हल्ला करतील अशी भीती व्यक्त होत आहे. दिल्लीत सर्व जिल्ह्यांचे पोलिस आणि गुन्हे अन्वेषण विभाग आणि विशेष शाखेचे पोलिस सतर्क झाले आहेत, असे पीटीआयच्या वृत्तात म्हटले आहे.
हे अतिरेकी ‘जैश ए महंमद’ किंवा ‘लष्कर ए तोयबा’शी संबंधित असावेत. आणखी एक अतिरेकी दिल्लीत घुसण्याच्या तयारीत आहे. त्यांच्याकडे पाकिस्तानी बनावटीची स्फोटके आणि बॉम्बचा मोठा साठा असल्याची माहिती गुप्तचरांनी दिली आहे, असे एबीपीच्या वृत्तात म्हटले आहे.
सुरक्षा दलांनी जम्मू काश्मिरमध्ये दहशतवाद्यांचे कंबरडे मोडल्यामुळे दहशतवाद्यांनी दिल्लीला लक्ष बनवण्याचा कट आखलेला असण्याची शक्यता संरक्षण तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. तेथे जून महिन्यात तब्बल 55 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. पाकिस्तानच्या दहशतवादी यंत्रणेचा म्होरक्या रियाझ नायकू याला यमसदनी धाडल्यानंतर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी यंत्रणेला हादरा बसला आहे.