माहिती न घेताच केली पाहणी : आकुडीतील सेंटरमध्ये बाहेरुन आणले जाते अन्न
पिंपरी – “करोना’चा संसर्ग होण्याचा अधिक धोका असलेल्या नागरिकांना महापालिकेकडून क्वारंटाइन केले जाते. या नागरिकांना “करोना’ होऊ नये, यासाठी रोग प्रतिकारशक्ती वाढावी म्हणून विशेष काळजी घेण्याची गरज असते. परंतु क्वारंटाइन सेंटरमध्ये वेळेवर आणि चांगले अन्न पुरविले जात नसल्याच्या तक्रारी येत होत्या. अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाच्या पथकाने अन्नाची गुणवत्ता तपासण्यासाठी येथे भेट दिली. परंतु भेट देण्यापूर्वी कोणतीही माहिती न घेतल्याने तिथे गेल्यावर पथकाला कळाले की येथे अन्न शिजविले जात नाही, तर बाहेरुन आणले जाते.
महापालिकेने करोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांसाठी आकुर्डी येथील पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये बनविलेल्या क्वारंटाइन सेंटरमधील किचनची परिस्थिती पाहण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या (एफडीए) पथकाने नुकतीच भेट दिली. संबंधित केंद्रातील नागरिकांसाठी बाहेरून तयार अन्न आणले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे हे अन्न जेथून आणले जात आहे, तेथील पाहणी करण्याचे नियोजन एफडीएने केले आहे.
“एफडीए’चे अन्न सुरक्षा अधिकारी संतोष सावंत यांच्यासह पथकाने नुकतीच पाहणी केली आहे. क्वॉरंटाइन सेंटरमधील नागरिकांसाठी जेथून अन्न आणले जात आहे, तेथील स्वच्छता व अन्य बाबींची तपासणी केली जाणार आहे. त्यामध्ये काही त्रुटी आढळल्यास संबंधित अन्न पुरवठादाराविरुद्ध कारवाई केली जाईल, असे “एफडीए’चे सहाय्यक आयुक्त संजय नारागुडे यांनी सांगितले.
मोशी येथे सापडल्या होत्या अळ्या
महापालिकेने मोशी येथील समाजकल्याण विभागाच्या मागासवर्गीय वसतिगृहात बनविलेल्या क्वारंटाइन सेंटरमध्ये नाश्त्यात अळ्या व केस सापडण्याची घटना नुकतीच घडली. त्यानंतर “एफडीए’कडून संबंधित क्वारंटाइन सेंटरची पाहणी करण्यात आली होती. त्या वेळी संबंधित क्वारंटाइन सेंटरमधील किचनमध्ये अस्वच्छता आढळली. तसेच, तेथील अन्न पुरवठादाराकडे योग्य परवाना नसल्याचे देखील निदर्शनास आले. त्यास अनुसरून संबंधित पुरवठादाराकडून “एफडीए’ने 11 हजार 150 रुपयांचा दंड वसूल केला आहे. तसेच, संबंधित पुरवठादाराला तीन दिवसांमध्ये त्रुटी पूर्तता करावी, असे स्पष्ट करण्यात आले.
कधी होणार कारवाई?
संसर्ग होण्याचा अधिक धोका असलेल्या नागरिकांना क्वारंटाइन करण्यात येते. या नागरिकांच्या आरोग्याची आणि आहाराची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. परंतु महापालिका प्रशासनाने येथेही निष्काळजीपणा दाखविला. गेल्या एक आठवड्यापासून येथील नागरिक तक्रार करत आहेत आणि अद्यापही “एफडीए’कडून पाहणीचे नियोजनच करण्यात येत आहे. यामुळे कारवाई कधी होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
वायसीएमच्या उपहारगृहातही आढळली होती अस्वच्छता
अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने महापालिकेच्या पिंपरी-संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात 20 ते 25 दिवसांपूर्वी तपासणी करण्यात आली होती. रुग्णालयात उपाहारगृहात अस्वच्छता आढळली होती. त्यामुळे कॅन्टीन चालकाला त्यामध्ये सुधारणा करण्याबाबत नोटीस बजावण्यात आली होती. अद्याप त्याचे उत्तर “एफडीए’ला प्राप्त झालेले नाही.