नवी दिल्ली -गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर भारताने पुन्हा कुरापतीखोर चीनला सुनावले आहे. चीनने प्रत्यक्ष ताबा रेषेच्या (एलएसी) पलिकडील स्वत:च्या हद्दीतच हालचाली कराव्यात. त्या देशाने सीमेचे स्वरूप बदलण्याची एकतर्फी कृती करू नये, असा स्पष्ट संदेश भारताने दिला आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी गुरूवारी ऑनलाईन पत्रकार परिषदेत जोरदारपणे भारताची भूमिका मांडली. सीमा व्यवस्थापनाविषयी भारताने नेहमीच जबाबदार दृष्टीकोन बाळगला आहे. एलएसीलगत असणाऱ्या भारतीय हद्दीतच आम्ही हालचाली करतो. चीनकडूनही आमची तशीच अपेक्षा आहे, या भूमिकेचा त्यांनी पुनरूच्चार केला. सीमा भागांत शांतता अबाधित राखली जावी. कुठल्याही मतभेदांवर चर्चेद्वारे तोडगा काढला जावा अशी आमची नेहमीची आणि ठाम भूमिका आहे. त्याचवेळी भारताचे सार्वभौमत्व आणि क्षेत्रीय अखंडत्व जपण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, असे त्यांनी निक्षून सांगितले. भारत आणि चीन विविध स्तरांवरून सातत्याने एकमेकांच्या संपर्कात असल्याचेही श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले.