नगर -सामाजिक भावनेतून शिववरद प्रतिष्ठान उद्यापासून गरजु नगरकरांना अत्यल्प दरातील भोजनथाळी उपलब्ध करुन देत आहे. रंगारगल्लीतील एस. टी. महाले मंगल कार्यालयास सकाळी अकरा ते दुपारी दोन, या वेळेत ही सेवा देणार असल्याचे शिववरद प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन डागवाले यांनी सांगितले.
प्रतिष्ठानाचे संस्थापक व ज्येष्ठ नेते किशोर डागवाले यांच्या संकल्पेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यात प्रभागातील नागरीकांसह शहरातून येणाऱ्या अन्य गरजुंनाही या केंद्रातून अवघ्या दहा रुपयांत भरपेट जेवण देणार असल्याचे अन्नछत्राचे व्यवस्थापक सुभाष दारवेकर यांनी सांगितले.
लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरु झाला आहे. तथापि, हातावर पोट असलेल्यांना अजुनही रोजगार मिळण्याची शक्यता धुसर दिसते. त्यामुळे त्यांच्या पोटाला लॉकडाऊन उघडल्यानंतरही अन्न मिळेलच, याची शाश्वती नाही. त्यामुळे मंडळाचे पदाधिकारी व दानशूर व्यक्तिंच्या योगदानातून हा उपक्रम सुरु करत असल्याचे प्रतिष्ठानाचे संस्थापक किशोर डागवाले म्हणाले.
त्यातही कोणत्याही सरकारी मदतीशिवाय हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. गरजुंसाठी सरकारी थाळीप्रमाणे अवघ्या दहा रुपयांत ही भोजनथाळी देणार आहे. एका थाळीत तीन चपात्या, भाजी, वरण-भात, असे शुद्ध, सात्विक व दर्जेदार अन्न दिले जाणार आहे. ज्या नागरीकांना थेट एस. टी. महाले मंगल कार्यालयात पोचता येणार नाही, त्यांच्यासाठी सेवा म्हणून ही थाळी पार्सल म्हणूनही दिली जाणार असल्याची माहिती शिववरद प्रतिष्ठानाचे पदाधिकारी बाबासाहेब वैद्य, शहाजी डफळ, सागर गोरे यांनी यांनी दिली.
करोनाच्या पार्श्वभूमीवर घोषित झालेल्या लॉकडाऊनच्या काळात शिववरद प्रतिष्ठानने तब्बल अडीच महिने दररोज नगरमधील साधारण 700 नागरीकांच्या जेवणाची व्यवस्था केली. गर्दी टाळण्यासाठी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी घरोघर जाऊन भोजन वाटप केल्याची माहिती ज्येष्ठ नेते डागवाले यांनी दिली.
प्रतिष्ठानाच्या मागणीवरुन नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी नगरमध्ये त्यांना या सामाजिक कामासाठी जागा उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले होते.
लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरु झाला आहे. सामान्य माणसाच्या हाताला अजुनही काम मिळालेले नाही. त्यात सामाजिक भावनेतून गेली दोन ते अडिच महिने सुरु असलेली सामाजिक संस्था व संघटनांची अन्नछत्र आता बंद होत आहेत. अशावेळी सामान्य माणसाच्या त्याच्या जगण्याचीच चिंता पडली आहे. ही चिंता कमी करण्याचा शिववरद प्रतिष्ठान प्रयत्न आहे. नगरमध्ये असे अनेक अन्नछत्र सुरु झाल्यास सामान्य माणूस उपाशीपोटी राहणार नाही, हे नक्की.
किशोर डागवाले , संस्थापक, शिववरद प्रतिष्ठान, नगर.