नवी दिल्ली : करोना संसर्गजन्य आजार असल्याने राज्य सरकारकडून गर्दी टाळून व्यवहार सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातच आता राज्यातील शाळा सुरू होणार की नाही, असा प्रश्न काही दिवसांपासून चर्चेत होता. अखेर राज्य सरकारने वर्ग न भरवता शाळा सुरू करण्याच्या दिशेने काम सुरू केले आहे. आगामी शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना टिव्ही आणि रेडिओवरून शिक्षणाचे धडे दिले जाणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने दूरदर्शनचे १२ तास, तर रेडिओचा दोन तासाचा वेळ देण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्राने याविषयी माहिती दिली आहे.
राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाला यासंदर्भातील पत्र पाठवले आहे. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने डिजिटल शिक्षणाच्या दृष्टीकोनातून प्राथमिक ते माध्यमिक वर्गासाठी एक हजाराहून अधिक तासांची डिजिटल शिक्षण साहित्य संग्रहित केले आहे. त्यामुळे आगामी शैक्षणिक वर्षात दूरदर्शनच्या दोन वाहिन्यांवरून दररोज १२ तास, तर ऑल इंडिया रेडिओवरून दोन तास शैक्षणिक अभ्यासक्रमाच प्रसारण करण्याची राज्य सरकारची तयारी आहे,असे वर्षा गायकवाड यांनी पत्रात म्हटले आहे.
दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिन्यांवरून प्रसारण केल्यास गाव खेड्यातील मुलं शिक्षण घेतील. त्यांच्यासाठी हे अधिक सोयीचं आहे. ऑनलाईन वर्ग घेण्यासाठी स्मार्टफोन किंवा विशिष्ट प्रणाली असणं आवश्यक ठरतं. त्याचबरोबर चांगली इंटरनेट सुविधाही लागते. त्यासाठी खर्च करावा लागतो. ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थी गरीब घरातून येतात. त्यामुळे त्यांना या गोष्टी करणं अशक्य आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याचं शिक्षण कोणताही खंड न पडता सुरू राहावं, असा सरकारचा विचार असल्याचेही वर्षा गायकवाड यांनी म्हटले.