नवी दिल्ली : देशात करोना रुग्णांच्या संख्येत काही केल्या घट होताना दिसत नाही. कारण सलग सातव्या दिवशी करोनाच्या रुग्णांमध्ये सहा हजारहून अधिकने वाढ झाली आहे.
गेल्या चोवीस तासांमध्ये ६,५६६ रुग्णांनी भर पडली आहे तर १९४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशभरात करोनाच्या रुग्णांची संख्या १ लाख ५८ हजार ३३३ झाली असून एकूण मृत्यू ४,५३१ आहे. ६७,६९२ रुग्ण बरे झाले आहेत. मुंबई, चेन्नई, दिल्ली, अहमदाबाद, ठाणे, पुणे, हैदराबाद, कोलकाता, इंदौर, जयपूर, जोधपूर, चेंगळपट्टू आणि थिरूवल्लूर या १३ शहारंमध्ये ७० टक्के करोनाचे रुग्ण आहेत.
भारतातही लस शोधण्यासाठी प्रयत्न केले जात असून वैद्यकीय संस्था, जैव-वैद्यकीय संशोधन संस्था, अभ्यासक, तज्ज्ञ व्यक्ती असे तब्बल ३० संस्था-गट-व्यक्ती संशोधन करत आहेत. त्यापैकी २० गट अधिक वेगाने प्रगती करत आहेत, अशी माहिती केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार डॉ. के. विजय राघवन यांनी दिली.
दरम्यान, देशभरात अडकून पडलेल्या आणि आपल्या गावी परत जाऊ इच्छिणाऱ्या स्थलांतरित मजुरांकडून रेल्वेगाडी किंवा बसद्वारे प्रवासाकरता कुठलेही भाडे आकारू नये आणि त्यांना अन्न व पाणी उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. या मजुरांची रेल्वे किंवा बसने जाण्याची सोय होईपर्यंत त्यांना हे अन्न कुठे मिळेल याची त्यांना सूचना देण्यात यावी, असे न्यायालयाने म्हटले आहे.