ट्रकचालक गावी गेल्यामुळे 30 टक्केच ट्रक धावताहेत रस्त्यावर
पुणे – करोनामुळे शेकडो ट्रकचालक हे गावी गेल्यामुळे लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात सुरू झालेला ट्रान्सपोर्ट व्यवसाय अजूनही पूर्ण क्षमतेने सुरू झालेला नाही. सध्या फक्त 30 टक्केच ट्रक रस्त्यावर धावत असल्याची माहिती ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांनी दिली आहे.
लॉकडाऊन काळातच ट्रान्सपोर्ट व्यवसाय पुन्हा सुरू करण्यात आला. जीवनावाश्यक वस्तूंची वाहतूक करणे महत्त्वाचे असल्यामुळे सरकारने या वाहतुकीला परवानगी दिली. त्यामुळे राज्यातील बहुतांशी ट्रान्सपोर्ट कंपन्या सुरू झाल्या, पण या कंपन्यांना सगळ्यांत मोठी अडचण भेडसावत आहे, ती ट्रक चालकांची. मुंबई आणि पुण्यात सध्या करोना रुग्णांची संख्या ज्या प्रमाणात वाढत आहे, ते पाहता तूर्तास तरी चालक परत कामावर येतील, अशी शक्यता नसल्याचा दावा या व्यावसायिकांनी केला आहे.
यासंदर्भात अधिक माहिती देताना माल वाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे म्हणाले, “राज्यातील वाहतुकीबरोबर ऑल इंडिया परमिट असणाऱ्या व्यावसायिकांवरसुद्धा परिणाम झाला आहे. ऑल इंडिया वाहतूक करणारे चालक हे बहुतांशी परप्रांतीय असतात. उत्तर प्रदेश किंवा बिहार येथून हे येतात. पण ते आता गावी गेले आहेत. त्यामुळे ही वाहतूक तर बंदच पडली आहे. जेएनपीटी येथे चालक नसल्यामुळे ट्रेलर रस्त्याकडेला उभे असल्याचे दिसून येत आहे.
राज्यात सुमारे 25 लाख ट्रक आहेत. त्यातील 70 टक्के ट्रक उभे आहेत. त्यामुळे माल वाहतुकीला मोठी अडचण येत आहे. सध्या फक्त जावनावश्यक वस्तूंची वाहतूक करण्यावरच भर दिला जात आहे. हा व्यवसाय पूर्ण क्षमतेने सुरू व्हायला आणखी दोन महिने तरी लागतील.
-बाबा शिंदे, अध्यक्ष, माल वाहतूकदार संघटना