संगमनेर -रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर स्वयंस्फूर्तीने दोन दिवस पाळलेला बंद संपताच संगमनेरकरांनी आज शहराच्या बाजारपेठेत तुफान गर्दी केली. सकाळच्या सत्रात प्रशासनाकडून वाहनावरील स्पीकरद्वारा करोनाचे नियम पाळण्याचे आवाहन केले गेले, मात्र बहुतेक ठिकाणी या नियमांचा फज्जा उडवित नागरिकांची हुल्लडच अनुभवायला मिळाली. बॅंका, कापड, किराणा, औषधे अशा सर्वच दुकानांमध्ये झालेली गर्दी जणू करोनाचे संकट संपल्याचाच अर्विभाव प्रकट करीत होती. यातून या महामारीचा उद्रेक होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
ृसंगमनेर शहरात 23 मेच्या मध्यरात्रीपर्यंत हॉटस्पॉट घोषीत असल्याने संगमनेरची बाजारपेठ 24 मे रोजी खुली होणे अपेक्षित होते. मात्र 25 मे रोजी रमजान ईद असल्याने खरेदीसाठी गर्दी होण्याचा अंदाज गृहीत धरुन स्थानिक व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दोन दिवसांचा कडकडीत बंद पाळला. त्यानंतर आज (ता.26) सकाळी 9 वाजता शहरातील बहुतेक सर्वच दुकाने उघडली.
आज सकाळपासूनच शहरातील बाजारपेठेत ग्राहकांची मोठी गर्दी दिसून आली. प्रशासनाने सूचना दिल्याप्रमाणे बहुतेक सर्व दुकानदारांनी सामाजिक अंतराचे चौकानही रेखाटले. मात्र सुरुवातीचा काहीवेळ गेल्यानंतर गर्दी वाढल्याने अनेक ठिकाणी सामाजिक अंतर या संकल्पनेचाच फज्जा उडालेला दिसला. खासगी, सहकारी बॅंका व पतसंस्थांनी मात्र या नियमांची सक्तीने अंमलबजावणी केल्याचे दिसत असताना बहुतेक सरकारी बॅंकांनी मात्र आपल्या ग्राहकांची सुरक्षितता रामभरोसे’ सोडून दिल्याचे भयानक दृष्यही बघायला मिळाले.
शहराचा मुख्य गाभा असलेली जुनी बाजारपेठ, मेनरोड, चावडी ते छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा, बसस्थानक परिसर, नवीन नगर रोड अशा सर्वच रस्त्यांवर दुचाकी, चारचाकी वाहनांसह नागरिकांची अक्षरशः जत्रा बघायला मिळत होती. बहुतेक सर्वच दुचाकीस्वार डबल आणि ट्रिपल सीट तर चारचाकी वाहनधारक तिघांपेक्षा अधिक प्रवाशी घेवून वावरत असल्याचे दिसून आले. एकंदरीत 14 दिवसांच्या हॉटस्पॉट’ नंतरही करोना विषाणूंचा भयानक धोका असतांनाही संगमनेरकरांनी स्वतःच्या जीवापेक्षा जीवनावश्यक व चैनीच्या वस्तुंना अधिक महत्व दिल्याचे दृष्य आज संगमनेरातील रस्त्यारस्त्यावर दिसले.