जामखेड – मागील आठ दिवसांपासून उन्हाचा पारा वाढतच आहे. गेल्या दोन दिवसांत तर उन्हाचा पारा चाळीशीकडे झेपावत आहे. त्यामुळे उन्हाळी पिके, भाजीपाला करपू लागली आहेत. त्यामुळे खरीप पूर्वीची कामे थंडावली आहेत. त्यातच पाण्याचा प्रश्न गंभीर होत असताना मात्र पोटाची आग विझविण्यासाठी तळपत्या उन्हात शेतमजूर काम करत आहेत.
उन्हाळी पिके, भाजीपाला, फुलांना उन्हाचा फटका बसला आहे. खरीप पूर्व तयारीसाठी शेतीच्या मशागतीची कामे मे महिन्यात होतात. सध्याच्या वाढत्या तापमानामुळे या कामालाही फटका बसला आहे. हातावर पोट असणारे महिला व पुरुष उन्हाची पर्वा न करता काम करताना दिसतात. तालुक्यात पाण्याची स्थिती गंभीर होत असून, विहिरी व बोअरचे पाणी कमी होत असल्याने ग्रामस्थांना पाणीटंचाईची झळ सोसावी लागत आहे. मागील आठवड्याभरापासून सूर्य आग ओकत आहे. त्यामुळे सर्वजण हैराण झाले आहेत. सूर्यनारायनाने आग ओकण्यास सुरुवात केल्याने तालुक्यात शेतीचा गाडा थबकला आहे. प्रखर उन्हामुळे उभी पिके सुकू लागली असून, वाढत्या तापमानाचा फटका फळबागांनाही बसत आहे. पाण्याची पातळीही झपाट्याने खालावत आहे.
गेल्या आठवड्यापासून उन्हाचा पारा वाढत आहे. मागील तीन दिवसांपासून तर चालू वर्षातील उच्चांकी पातळीवर तापमान गेले आहे. सध्या शेतकरी खरीप हंगामाच्या पूर्वतयारीत गुंतला आहे. या वाढलेल्या उन्हाने त्यालाही सावलीत बसण्यासाठी भाग पडले आहे. बागायती क्षेत्रातील पिकेही या वाढलेल्या उन्हाने सुकू लागली आहेत. उन्हाळ्यात शहरात भाजीपाल्याला असणारी मागणी पाहत तालुक्यातील शेतकऱ्यांचा कल भाजीपाला पिकाकडे असतो. मात्र या वाढलेल्या उन्हामुळे हा भाजीपाला करपू लागला आहे. ऊस पिकावर ही या वाढत्या उन्हामुळे गाभे पडत आहेत.
यंदा तालुक्यातील शेतकऱ्यांनी दराच्या अपेक्षेने उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली होती. सध्या हा कांदा काही ठिकाणी काढून साठवला आहे. काही ठिकाणी काढणीच्या अवस्थेत आहे. या वाढलेल्या उन्हामुळे हा कांदा मोठ्या प्रमाणात सडत आहे. त्याच्या प्रतीवर विपरित परिणाम होत आहे. वाढलेल्या तापमानामुळे पाण्याची पातळी खालावली आहे. शहर परिसरात 39 अंशांच्या जवळपास तापमान होते. त्यामुळे अंगाची लाहीलाही होत आहे.