अकोले -टोमॅटो प्रश्नी शेतकऱ्यांना अचूक व समाधानकारक निदान उपलब्ध करावे व पीक नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी, या मागणीसाठी किसान सभेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठविण्यात आले आहे, अशी माहिती किसान सभेचे प्रांतिकचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी दिली.
निवेदनात म्हटले आहे की, शेतकऱ्यांनी बंगळुरू येथील आयआयएचआर या संस्थेला पाठविलेल्या नमुन्यांचे निष्कर्ष शेतकऱ्यांना प्राप्त झाले आहेत. त्यानुसार टोमॅटोवर चार विषाणूंचा संसर्ग झाला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. फळ परिपक्व होण्याच्या काळात तापमान वाढल्यामुळे, खतांचा व पोषकांचा अती वापर झाल्याने टॉमेटो पिकाचे नुकसान झाल्याचे सूचित करण्यात आले आहे. मात्र याबाबत शेतकरी सहमत नाहीत, असे डॉ नवले यांनी सांगितले. वरील विषाणूंचा संसर्ग टोमॅटो पिकात या पूर्वीही आढळलेला आहे. मात्र एकाच वेळी हा संसर्ग साथी सारखा चार जिल्ह्यांत पसरल्याची बाब वेगळी आहे. संसर्गाचे साथ सदृश परिस्थितीत रूपांतर कशामुळे झाले, हे या पार्श्वभूमीवर शोधणे आवश्यक आहे. प्राप्त अहवालावरून या संसर्ग विस्ताराचे समाधानकारक उत्तर मिळत नाही.
वाढलेल्या तापमानामुळे विषाणू संसर्गाचे साथीत रूपांतर झाले, असे सूचित करण्यात येत आहे. मात्र मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी टॉमेटो उत्पादक पट्ट्यातील तापमान कमी राहिलेले आहे. विषाणू संसर्गाचे वाहक असलेल्या पांढरी माशी, मावा कीड यासारख्या संसर्ग माध्यमांचा मोठा फैलाव कोठेही आढळला नाही, असे असताना हा संसर्ग जिल्ह्याच्या सीमा पार करून चार जिल्ह्यांत कसा पोहचला, याचे समाधानकारक उत्तर मिळत नाही. आगामी काळात संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी ते आवश्यक आहे, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. टॉमेटो पिकाच्या या नुकसानीला बियाण्यांमधील दोष कारणीभूत आहे काय, या अंगाने चौकशी होण्याची आवश्यकता आहे, यावर त्यांनी बोट ठेवले. यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा, असे आवाहन अशोक ढवळे, जे. पी. गावित, किसन गुजर, अर्जुन आडे, डॉ. नवले यांनी केले आहे.