विश्वकरंडक स्पर्धेला महत्त्व द्यायला हवे; बीसीसीआयचे आयसीसीवर वर्चस्व
मेलबर्न – देशात लॉकडाऊन असल्याने तसेच करोनाचा धोका अद्याप कायम असल्यामुळे जर ऑस्ट्रेलियातील टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा जर रद्द करण्याचे प्रयत्न सुरू असतील तर मग आयपीएल स्पर्धादेखील रद्द केली पाहिजे, अशा शब्दांत ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार ऍलन बॉर्डर यांनी आयसीसी व बीसीसीआयवर टीका केली आहे.
जगभरात करोनाचा धोका अद्यापही कायम आहे. ऑस्ट्रेलियासह अनेक देशांत लॉकडाऊनही करण्यात आले आहे. येथील लॉकडाऊन तर सहा महिन्यांचा असून तो 30 सप्टेंबरला संपणार आहे. मग अशा स्थितीत विश्वकरंडक स्पर्धेत सहभागी होत असलेल्या खेळाडूंना ऑगस्ट महिन्यात येथे यावे लागेल व स्पर्धेपूर्वी 14 दिवसांसाठी विलगीकरण कक्षात राहावे लागेल. यासाठी जर विविध देशांचे संघ तयारी दाखवत नसतील मात्र आयपीएल साठी तडजोड करायला तयार असतील तर ते योग्य नाही. प्रथम देशाला प्राधान्य द्यायला हवे मगच आयपीएलसारख्या स्पर्धांना. सध्याचे चित्र पाहता असे स्पष्ट होते की आयसीसी व बीसीसीआय विश्वकरंडक स्पर्धेपेक्षा आयपीएल व्हावी यासाठीच प्रयत्न करत आहेत, अशी टीकाही बॉर्डर यांनी केली.
आयपीएल रद्द झाली तर बीसीसीआयला हजारो कोटी रुपयांचा तोटा होणार आहे. त्यात आयसीसीचेही आर्थिक हितसंबंध जपले जाणार आहेत हे उघड आहे. मग जर विश्वकरंडकासारखी मानाची स्पर्धा आयपीएलसाठी रद्द करण्याचाच हा डाव आहे. आयसीसी ही जागतिक क्रिकेटची सर्वोच्च संघटना आहे त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटलाच महत्व दिले पाहिजे. पण ते होताना दिसत नाही. जर विश्वकरंडक स्पर्धा रद्द केली जाणार असेल तर आयपीएललादेखील तोच न्याय लावला गेला पाहिजे. आयपीएलसाठी विश्वकरंडकाचा बळी देऊन आयसीसी व बीसीसीआय चुकीचा पायंडा पाडत आहेत, असेही बॉर्डर म्हणाले.
बीसीसीआयची हाव कधी संपणार…
विश्वकरंडक स्पर्धा रद्द व्हावी, यासाठी बीसीसीआयकडून आयसीसीवर दबाब टाकला जात आहे. जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ अशी ओळख असलेल्या बीसीसीआयची हाव कधी संपणार, असा सवालही बॉर्डर यांनी केला.