कोल्हापूर, दि. 23 – करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार लवकरच मोठे पॅकेज जाहीर करेल. यात लघु उद्योजकांसाठी आवश्यक तरतूद करण्यात येणार आहे. हे पॅकेज पाहून भाजप नेत्यांचे डोळे पांढरे होतील, असा विश्वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मागणीवरून हसन मुश्रीफ यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.
हसन मुश्रीफ म्हणाले, लॉकडाउनमुळे राज्यातील सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून छोटे व्यापारी, रिक्षा चालक, फळ विक्रेते यांचा व्यवसाय पूर्ण बंद आहे. तसेच लघु उद्योजकांनाही मोठा फटका बसला आहे. तसेच अनेकांचा रोजगारही बुडला असून आर्थिक नियोजनाची घडी विस्कटली आहे.
केंद्राने जाहीर केलेल्या पॅकेजमुळे या सर्व घटकांची घोर निराशा झाली आहे. या घटकांसाठी राज्य सरकारकडून योग्य उपाययोजना आखण्यात येणार आहे. यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी काम सुरू केले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
केंद्राने 20 लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले. मात्र, हे पॅकेज नसून सगळं कर्जच आहे. पेंडिंग आणि लेंडिंग यामध्ये खूप मोठा फरक आहे. याचा लोकांना काहीही फायदा नाही. मात्र, महाराष्ट्र सरकार बारा बलुतेदार आणि श्रमिकांना असे मोठे पॅकेज देईल की यांचे (भाजपचे) डोळे पांढरे होतील.
महाविकास आघाडी सरकार कसे अडचणीत येईल, यासाठी राज्यातील भाजप नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत. जीएसटीचे 12 हजार कोटींची थकबाकी द्यायची होती.
आज मी आकडा घेतला साडेपाच हजार कोटींची थकबाकी यायची आहे. पीएम केअरमधून किती पैसे दिले? मुंबईतून सर्व पैसे पीएम केअरला गेले आणि 400 कोटी रुपये महाराष्ट्राला दिले. उत्तर प्रदेशला 1500 कोटी रुपये दिले. हा कुठला न्याय?, असा सवालही त्यांनी केला.