नगर -पावसाळ्यापूर्वीच शहर व उपनगरातील पथदिव्यांची पहाणी करून नादुरुस्त दिव्यांची त्वरीत दुरुस्ती करावी. तसेच प्रत्येक प्रभागामध्ये पथदिवे वेळेत सुरु करून वेळेतच बंद करावे अन्यथा संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात येइल अशा, सुचना महापौर बाबासाहेब वाकळे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
महापालिकेच्या शहर व उपनगरातील पथदिवे सुरूळीत सुरु राहण्याच्या दृष्टिने विद्युत विभागाची महापौर बाबासाहेब वाकळे यांनी बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजप शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, नगरसेवक मनोज दुलम, रवींद्र बारस्कर, राहुल कांबळे, मनोज कोतकर, संजय ढोणे, अजय चितळे, गणेश नन्नवरे, सतिष शिंदे, विलास ताठे, उदय कराळे, शहर अभियंता सुरेश इथापे, बत्ती मुकादम क्षेत्रे, पुष्कर कुलकर्णी, विद्युत विभागातील वायरमन आदी उपस्थित होते.
यावेळी वाकळे यांनी बैठकीपूर्वी सर्व सदस्य व कर्मचाऱ्यांना सोशल डिस्टसिंगने बसण्याबाबत सुचना दिल्या. कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर उपलब्ध करून दिले. पावसाळा सुरू होत असल्याने पथदिवे बाबत अनेक तक्रारी येवू शकतात या करिता सर्व कर्मचारी यांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. एखाद्या भागात तक्रार आल्यास त्या ठिकाणी तातडीने उपस्थित राहून तक्रारीचे निराकरण करावे. अनेक भागात पथदिव्यांच्या तारांना झोळ पडला आहे. त्यामुळे अनेक वेळा विद्युत प्रवाह खंडीत होत असून नगरकरांना आंधारात राहावे लागते. त्यामुळे लवकरात लवरक तारांचा झोळ काढून घ्यावा अशा सुचना त्यांनी केल्या आहेत.