कोळकी -आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी पत्रकारिता, समाजकारण आणि शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे कार्य केले. अवघ्या 34 वर्षांच्या आयुष्यात त्यांनी विविध क्षेत्रात केलेली घोडदौड उल्लेखनीय होती. पत्रकार विविधांगी असतो हे बाळशास्त्री जांभेकर यांनी दाखवून दिले. जांभेकरांनी समाज सुधारणा, शिक्षण यासाठी पत्रकारिता सुरू केली. स्वातंत्र्य चळवळीत टिळक, आगरकर यांच्यासारख्या समाजधुरिणांनी आपल्या पत्रकारितेतून लोकांना स्वातंत्र्याचे मोल सांगितले. स्वातंत्र्योत्तर काळातही पत्रकारांचे योगदान मोठे आहे. असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी व्यक्त केले.
मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक “दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या 174 व्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्यावतीने ऑनलाइन अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी ते बोलत होते. महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे संस्थापक-अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ, पत्रकार अरविंद मेहता, विजय मांडके, शशिकांत नारकर, सौ. अलका बेडकिहाळ, अमर शेंडे, गजानन पारखे, अशोक खांबेकर, डॉ. समीर नाडगौडा, विक्रम चोरमले, विजय पाटील, प्रदीप चव्हाण, भारद्वाज बेडकिहाळ, रोहित वाकडे, मयूर देशपांडे, प्रसन्न रुद्रभटे, गौरव वाकडे, डॉ. विद्येश गंधे, आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक कानिफनाथ ननावरे हे कार्यक्रमात सहभागी झाले होते. रवींद्र बेडकिहाळ म्हणाले, करोनाच्या प्रादुर्भावामुळे पोंभुर्ले येथील बाळशास्त्रींच्या पुण्यतिथी कार्यक्रमाची परंपरा खंडित झाल्याची खंत आहे. तथापि, डिजिटल माध्यमातून जांभेकरांना आदरांजली वाहता आल्याचे समाधान आहे. मुंबई ही जांभेकरांची कर्मभूमी असून तेथे त्यांचे स्मारक होण्यासाठी पत्रकार संघटनांच्या माध्यमातून राज्य शासनाकडे पाठपुरावा
करू.