कवठे -महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये सहकाराचे मोठे योगदान असून सहकाराने सर्वसामान्यांचे आर्थिक विकासास चालना मिळाली, असे मत सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केले. केले. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी या उक्तीप्रमाणे जीवन जगत भाऊसाहेब महाराज (अभयसिंहराजे भोसले) यांनी समाजातील तळागाळातील लोकांसाठी आपले जीवन समर्पित केले. विकास सेवा सोसायट्यांचे जाळे विणत बळीराजाला सक्षम करण्याचे महत्वपूर्ण काम केले. महाराष्ट्र राज्यातील सहकार क्षेत्राला चांगली दिशा देण्याचे त्यांनी राज्याचे सहकार मंत्री असताना केले, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्याच्या राजकीय आणि सामाजिक परंपरेत स्वकर्तृत्वाची मुद्रा उमटविणारे राज्याचे माजी सहकारी मंत्री व जिल्हा बॅंकेचे माजी ज्येष्ठसंचालक, जिल्ह्याचे नेते अभयसिंहराजे भोसले यांची जयंती बॅंकेच्या मुख्य कार्यालयात झाली.त्यावेळी ते बोलत होते. अजिंक्य उदयोग समूहाची उभारणी करण्याबरोबरच जिल्हयातील कृषी क्षेत्रात उच्च तंत्रज्ञानाचा अवलंब करुन ग्रीन हाऊस उभारणीपासून त्यांनी उत्पादित फुले व भाजीपाल्यास देशांतर्गत व परदेशी बाजारपेठ उपलब्ध करुन दिली. उच्च तांत्रिक शेतीसाठी कर्ज पुरवठा करण्यासाठी जिल्हा बॅंकेत हायटेक कृषी विभागाची स्थापना केली.त्यांचे कार्य आजही प्रेरणादायी आहे, असे सांगून शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, “जिल्हा बॅंकेचे कामकाज यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई, आर .डी .पाटील, आबासाहेब वीर आणि भाऊसाहेब महाराज यांच्या विचारधारेवर व रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.’
उपाध्यक्ष सुनील माने म्हणाले, “विना सहकार नही उद्धार’ हे ओळखून भाऊसाहेब महाराजांनी सहकारात क्रांती घडवली. अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना व सूतगिरणीच्या माध्यमातून तालुक्याचा सर्वांगीण विकास साधला.’ जिल्हा बॅंक सहकारातील दीपस्तंभ असून सध्या सहकारापुढे अनेक अडचणी आहेत, स्पर्धेला सामोरे जाऊन सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे, असे बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी सांगितले.