मुंबई : लॉकडाउनच्या काळात अत्यावश्यक सेवा बजावत असतानाही कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने आजपासून बेमुदत बंद पुकारला होता. यासंदर्भात मागणी करून दोन दिवस उलटल्यानंतरही बेस्ट उपक्रमाकडून चर्चेसाठी प्रतिसाद न मिळाल्याने बेस्टचे कर्मचारी ‘घरी राहा, सुरक्षित राहा’ या सरकारच्या घोषणेचा अवलंब करून कामावर रुजू होणार नसल्याचेही सांगण्यात आले होते. परंतु, महाव्यवस्थापकांच्या आवाहनानंतर अखेर हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे.
करोनाच्या काळात कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने आजपासून बेमुदत बंद पुकारण्याचा निर्णय घेतला होता. परंतु बेस्टच्या महाव्यवस्थापकांनी अत्यावश्यक सेवांच्या पार्श्वभूमीवर बेस्टच्या कर्मचाऱ्यांना पत्र पाठवत कामावर रुजू होण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर ६० टक्के कर्मचारी कामावर हजर झाले होते. त्यानंतर संपूर्ण कर्मचारी कामावर हजर झाल्याची माहिती समोर आली आहे.
‘बेस्ट’ उपक्रमातील जवळपास शंभरहून अधिक कर्मचारी आतापर्यंत करोनाबाधित झाले आहेत. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची आसपासच्या शहरांतून आणि मुंबईतून ने-आण करत असताना या कर्मचाऱ्यांना लागण झाल्याचे कामगार संघटनांचे म्हणणे आहे.