मायणी (प्रतिनिधी) – संपूर्ण राज्यामध्ये विखुरलेल्या वीट भट्टी कामगारांनाही ऊसतोड मजुरांप्रमाणे घरी जाण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेचे प्रदेशाध्यक्ष शाम राजे यांनी केली आहे.
शाम राजे म्हणाले, वीट भट्टी हा राज्यातील कुंभार समाजाचा मुख्य व्यवसाय आहे. भट्टी व्यवसायासाठी अवश्यक असणारे कामगार जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र व कर्नाटकातून येत असतात. तसेच प्रतिवर्षी एप्रिल महिन्यामध्ये पाण्याची कमतरता व मातीच्या अभावामुळे एप्रिल महिन्यामध्ये अनेक वीट व्यावसायिक वीट थापणी बंद ठेवत असतात.
शासनामार्फत करोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण वीट व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गेल्या महिन्याभरापासून हे वीट भट्टी कामगार बसून आहेत. त्यांच्या हाताला कोणत्याही प्रकारचे काम नाही, तसेच यावर्षीचा नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या पाच ते सहा महिने चालणारा हा उद्योग असल्याने हे कामगार प्रतिवर्षी एप्रिल महिन्यांमध्येच आपल्या घरी परतत असतात.
मात्र, यावर्षी करोना विषाणूच्या प्रादुर्भावाने शासनामार्फत संपूर्ण राज्यातील जिल्ह्यांमध्ये जिल्हा बंदीचे आदेश काढल्यामुळे हे वीटभट्टी कामगार आपापल्या ठिकाणी कामाविना थांबून आहेत. धनंजय मुंडे यांच्या शिफारशीनुसार राज्य शासनाने ऊसतोड कामगारांना घरी जाण्याची परवानगी दिली. शासनाने ऊसतोड कामगारांप्रमाणे वीटभट्टी कामगारांनाही घरी जाण्याची परवानगी द्यावी, अशी मागणीही मुख्यमंत्री कार्यालय, उपमुख्यमंत्री कार्यालयांमध्ये ई-मेल द्वारे करण्यात आली आहे.