बावडा – गेल्या काही दिवसांपासून कडक उन्हाच्या झळा आणि शनिवारी रात्री अचानक वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस कोसळल्याने बावडा (ता. इंदापूर) येथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
गेल्या पाच-सहा वर्षांत इंदापूर तालुक्यात खास करून नीरा नदीच्या किनाऱ्यालगतच्या भागात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी होते. अशातच गेल्या वर्षी परतीच्या पावसाने या भागाला चांगला दिलासा दिला. त्यातच करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने काढणीला आलेली पिके, फळबागा खरेदीअभावी शेतातच उभे आहेत, त्यातच शनिवारी झालेल्या अवकाळीमुळे हातातोंडाशी आलेले पीक भूईसपाट झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
बावडा, लाखेवाडी व शहाजीनगर या परिसरात शनिवारी रात्री झालेल्या गारांच्या पावसामुळे पुन्हा होत्याचे नव्हते झाले. जोरदार वाऱ्याने शेतात उरली सुरली फळांची झाडे तसेच इतर मका, कडवळ, गहू, मका आदी पिके भूईसपाट झाली आहेत. यापरिसरात शेवगा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लावला आहे. शेवग्याला शेंगा देखील मोठ्या प्रमाणात लागल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या.
मात्र झालेल्या वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीने शेवग्याच्या फांद्या मोडल्या आहेत. त्यामुळे शेतीचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत. गेल्या काही वर्षांत शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत दयनीय अशीच झालेली आहे. कधी नैसर्गिक, कधी लादलेली तर कधी अन्य कारणाने काहीही आपत्ती आली तरी त्यात सर्वप्रथम शेतकरीच भरडला जातो.
मात्र यावर कोणीच काही ठोस भूमिका घेत नसल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटात भरच पडत आहे. केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रयत्न करेल का? केली तरी खऱ्या गरजू व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचेल का? असा प्रश्न शेतकरी वर्गातून विचारला जात आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासून इंदापूर तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी धडपड करत आहे. परंतु सारखीच कोणती ना कोणती आपत्ती कोसळते आणि सगळ्यात पहिल्यांदा त्यात शेतकरीच भरडला जातो. आतातरी सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे यावे आणि शेतकऱ्यांना उभारी द्यावी.
– सुभाष घोगरे, शेतकरी