कोटा : देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यामुळे वेगवेगळ्या राज्यांमध्ये कामासाठी गेलेल्या मजूरांपासून, शिक्षणासाठी गेलेले विद्यार्थीही अडकले आहेत. अशातच योगी सरकारने राजस्थान मधल्या कोटा येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. राजस्थान मधल्या कोटा येथे अडकलेल्या 7500 विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी अडीचशे बसेस पाठवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
राजस्थानमधील कोटा शहरात आयआयटी प्रवेश परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी देशभरातून येत असतात. 25 मार्चपासून सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे कोटामध्ये उत्तरप्रदेश, बिहारसह इतरही राज्यांतील विद्यार्थी अडकले आहेत. 21 दिवसांच्या लॉकडाऊनमुळे त्यांचे हात होत आहेत. तसेच या विद्यार्थ्यांनी घरी परतण्यासाठी सोशल मीडियावर एक अभियानही सुरू केलं होतं. याच पार्श्वभूमीवर या सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलं आहे. शनिवार आणि रविवार अशा दोन दिवसांत हे विद्यार्थी घरी परतणार आहेत.
कोटामध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांनी ट्विटर वर #SendUsBackHome हे अभियानही सुरू केले होते. याची दखल घेत प्रशासनाने विद्यार्थांना घरी आणण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली. राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी योगी सरकारच्या कृतीचं स्वागत केलं आहे. इतर राज्यांनीही असं पाऊल उचलल्यास सहकार्य करू असे आश्वासनही त्यांनी दिले आहे.