पुणे – दरवर्षी मार्च-एप्रिलमध्ये बाजारात आंब्याची चाहूल लागते. यावर्षी वातावरणात झालेले बदल, अवकाळी पाऊस यामुळे आंब्याचा मोहोर करपण्याचं आणि गळून पडण्याचं प्रमाण वाढलं. त्यामुळे उत्पादनात घट झाली. त्यात कोविड-19 च्या संकटामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. आंबा विकत घेण्यास व्यापारी धजावत नसल्याने, आंबाविक्रीचे अर्थकारण कोलमडण्याची भीती आहे.
देवगडमध्ये तयार झालेला आंब्याचा माल प्रत्येकवर्षी पुणे, मुंबई व सांगलीच्या मुख्य बाजारपेठेत विकला जातो. यंदा मात्र आंब्याची गाडी कुणी न्यायला तयार नसल्याची परिस्थिती आहे. देवगडमधील आंबा उत्पादकांना पुणे, मुंबई, कोल्हापूर व सांगली ही हक्काची बाजारपेठ उपलब्ध आहे; मात्र, आता पुणे-मुंबईत करोनाचे सर्वांत जास्त रुग्ण असल्यामुळे याठिकाणी मालाची गाडी घेऊन जायला कोणी तयार नाही. त्याचबरोबर व्यापारी सांगतात माल पाठवला तरी बाजारात ग्राहक नाही. तयार झालेला आंबा पेट्यांमध्ये किती दिवस ठेवणार? जर हा आंबा खराब झाला तर लाखो रुपयांचं नुकसान होणार असल्याचे विदारक सत्य आहे.
यंदा आंब्याचा मोसम 15 ते 20 दिवस उशिरा सुरू झाला. त्यामुळे निर्यातही पुढे ढकलली गेली. कृषी व प्रक्रिया केलेले अन्न निर्यात प्राधिकरणातून मिळालेल्या माहितीनुसार दरवर्षी देशभरातून सरासरी 45 हजार मेट्रिक टन आंबा जगभरात निर्यात केला जातो.
यंदा 15 एप्रिलनंतर या निर्यातीला सुरुवात होणार होती, पण करोनाच्या संकटामुळे ती होईल की नाही, याबाबत चिंता व्यक्त केली जाते आहे. कृषी व प्रक्रिया केलेले अन्न निर्यात प्राधिकरणाच्या माहितीनुसार, 2017-18 मध्ये पहिल्या 50 देशांत 49197.17 मेट्रिक टन आंबा निर्यात झाला. 2018-19मध्ये पहिल्या 50 देशांत 46510.22 मेट्रिक टन आंबा निर्यात झाला होता. सध्या लॉकडाउनमुळे शेतकरी आंबा बाजारात विक्रीसाठी पाठवायला तयार आहे. पण व्यापारी शेतकऱ्यांकडून आंबा घ्यायला तयार नाहीत.
नोव्हेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने आंब्याच्या उत्पादनात मोठी घट झाली. दरवर्षीपेक्षा यंदा 40 टक्के उत्पादनात घट झाली आहे. 32-35 टक्के आंब्याचे उत्पादन यावर्षी होणार आहे. त्यात आता तयार झालेला आंबा हे त्यापैकी 15 टक्के उत्पादन आहे. त्यावरही करोनाचं संकट आहे. जर हा आंबा विकला गेला नाही तर उत्पादक शेतकरी कोलमडून जाईल.
– चंद्रकांत मोकाल, अध्यक्ष, राज्य आंबा उत्पादक संघ