वर्धा :- बाहेरच्या जिल्ह्यातील मजूर, कामगारांसाठी शहरात 6 निवारागृह तयार केले आहेत. सोमवारी पालकमंत्री सुनील केदार यांनी सर्व निवारागृहांना भेट देऊन तेथील कामगारांची आस्थेने विचारपूस करून व्यवस्थेची पाहणी केली.
देशात लॉक डाऊन होताच वाहतूक व्यवस्था ठप्प झाल्यामुळे इतर राज्यातील कामगार वर्ग अडकून पडला. अनेकजण पायी 100 किलोमीटरचा प्रवास करत वर्धा जिल्ह्यापर्यंत पोहोचले तर वर्धा जिल्ह्यातील कामगारांचे जत्थेही पायी गावाकडे निघाले होते. या सर्वांना सामाजिक संस्थांच्या मदतीने थांबवण्यात प्रशासनाला यश आले. त्यांची व्यवस्था निवारागृहात करण्यात आली. यासाठी, धर्मशाळा, शाळा आणि सूतगिरणीचा परिसर घेण्यात आला. या निवारागृहात प्रशासनाच्या समन्वयाने शहरातील सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने त्यांच्या निवास ,भोजन, कपडे, मनोरंजन इत्यादी व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व ठिकाणी आज पालकमंत्र्यांनी भेट देऊन तेथील लोकांची विचारपूस केली. तसेच तेथील व्यवस्था पाहणाऱ्यांच्या पाठीवर त्यांनी शाबासकीची थापही दिली.