वस्तू जादा दराने विक्री करणाऱ्यांवर गुन्हा दाखल
पुणे – संचारबंदी सुरू असल्याचा गैरफायदा घेऊन जीवनावश्यक वस्तू जादा दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कडक कारवाई करा, असा आदेश पोलीस आयुक्त डॉ.के.वेंकटेशम यांनी दिला असून त्यानुसार अशांवर कारवाई केली जात आहे. कल्याणीनगर व विश्रांतवाडी येथील मनोज गर्ग (महालक्ष्मी विहार, विश्रांतवाडी) व नथाराम देवासी (ता.वडगावशेरी) या दुकानदार, विक्रेते यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ व खंडणी विरोधी विभागाने केली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विश्रांतवाडी येथे गर्ग पेढी स्टोअर्स नावाचे किराणा मालाचे दुकान आहे. या दुकानात गर्ग हा मुग, गोटा खोबरे, शेंगदाणे, साखर यासारख्या वस्तू बाजार किमतीपेक्षा जादा दराने विक्री करीत होता. याबरोबरच कल्याणीनगर येथे हार्मनी सोसायटी जवळ देवासी याचे महेश मार्केट नावाचे दुकान आहे. तेथेही देवासी हा जादा दराने किराणा मालाची विक्री करीत होता.
याबाबतची खबर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ व खंडणी विरोधी विभागाला (पूर्व विभाग) मिळाली. त्यानुसार तेथे बनावट ग्राहक पाठवून पडताळणी करण्यात आली. त्यावेळी दोन्ही दुकानदार जादा दराने जीवनावश्यक वस्तू जादा दराने विक्री करत असल्याचे निदर्शनास आले, त्यानुसार पोलिसांनी दोघांविरुद्ध विश्रांतवाडी व येरवडा पोलीस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. गुन्हे शाखेने यापूर्वी सदाशिव पेठ व खडकी येथे कारवाई केली होती.
जीवनावश्यक वस्तू जादा दराने विक्री होत असल्याच्या घटना शहरात घडत आहेत, अशा दुकानदारांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त डॉ.के.वेंकटेशम यांनी दिले आहेत. त्यानुसार, कोणीही असा प्रकार करताना निदर्शनास आल्यास नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती द्यावी.
– अशोक मोराळे, अतिरिक्त पोलिस आयुक्त