हेमंत देसाई
व्यवसाय कमी झाला असला, तरी ऑनलाइन कंपन्यांना कार्यालयीन जागेचे भाडे व कर्मचाऱ्यांचा पगार यासाठी खर्च करावा लागतच आहे. त्यामुळे नफा कमी होणार किंवा तोटा वाढणार. अशा स्थितीत या कंपन्यांना आपला खर्च कमीत कमी कसा करता येईल, याची काळजी घ्यावी लागेल. काही छोट्या कंपन्यांना तर कठोर निर्णय घेणे भाग पडत आहे.
महाराष्ट्रातील लॉकडाउनचा कालावधी वाढवला जाऊ शकतो, असे सूतोवाच सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. खास करून मुंबई आणि शहरी भागांमध्ये हा कालावधी वाढवण्यात येणार आहे. मुंबईतील करोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सरकारी डॉक्टर आणि कर्मचारी रात्रंदिवस कामात व्यस्त आहेत. या डॉक्टरांना दिलासा देण्यासाठी टाटा सन्सच्या मालकीच्या इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडने पुढाकार घेतला आहे. मुंबईतील करोनाग्रस्तावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांसाठी आपल्या पंचतारांकित हॉटेलमधील खोल्या त्यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत. वांद्रे आणि कुलाबा येथे ही हॉटेल्स असून, उद्योगपती रतन टाटा यांनी करोनाविरुद्ध लढण्यासाठी व्यक्तीशः पाचशे कोटी रुपये दिले आहेत, तर टाटा सन्सकडून एक हजार कोटी रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे. खासगी क्षेत्राकडून अशीच अपेक्षा असून, टाटा समूहाचे कौतुक करावे तेवढे थोडे होईल.
21 दिवासांच्या लॉकडाउनमुळे देशाचे 5 ते 6 लाख कोटी रुपयांचे सकल राष्ट्रीय उत्पन्न (सराउ) कमी होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र त्याचवेळी कोव्हिड 19च्या त्सुनामीत ई-कॉमर्स उद्योग बुडणार आहे. तर ग्रोसर्सना मात्र नव्या संधी प्राप्त झाल्या आहेत. केंद्र सरकारने 14 एप्रिलपर्यंत सर्व प्रकारच्या मालाची व सेवांची विक्री थांबवली आहे. याला अपवाद आहे तो अन्नधान्य, औषधे व वैद्यक सामग्रीचा. भारताची ऑनलाइन रिटेलची वार्षिक उलाढाल साठ अब्ज डॉलर्स इतकी आहे. मोबाइल फोन्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि फॅशन क्षेत्रातील वस्तूंची तुफान ऑनलाइन विक्री होते. ज्या तीन वस्तूंच्या ऑनलाइन विक्रीस परवानगी आहे, त्यांची उलाढाल एकूण ऑनलाइन रिटेलच्या उलाढालीच्या तुलनेत खूपच कमी आहे. जागतिक नरमाई आणि भारतातील बाजारपेठांतील निरुत्साह यामुळे बहुतेक ऑनलाइन रिटेलर्स प्रचंड तोट्याच्या ओझ्याखाली आहेत. लॉकडाउनमुळे तर आंतरराज्यीय तसेच राज्यांतर्गत वाहतूक जवळपास ठप्प झाली आहे. अर्थव्यवस्थेतील एकूण हालचालच थांबल्यामुळे अनेक कंपन्या उत्पादनच करत नाही आहेत. काहीजणांनी मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. देशव्यापी लॉकडाउन जाहीर होण्यापूर्वी अनेक भागांत अगोदरच संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्यामुळे ई-कॉमर्स कंपन्यांच्या मागणीत सर्व प्रकारच्या वस्तूंबाबत साठ टक्के घट झालीच होती. 25 मार्चला लॉकडाउन जाहीर झाला. त्याच्या आदल्या दिवसापासूनच ऍमेझॉन व फ्लिपकार्ट या अग्रगण्य ऑनलाइन रिटेल कंपन्यांनी आपापल्या ग्राहकांच्या ऑर्डर्स घेण्याचे काम खूपच मर्यादित केले होते. घरगुती खाद्यवस्तू, वेष्टनबंद खाद्यान्ने, औषधे, स्वच्छता व व्यक्तिगत सुरक्षितता उत्पादने या महत्त्वाच्या वस्तूंचीच डिलिव्हरी केली जात होती. अन्य कमी प्राधान्यांच्या वस्तूंच्या ऑर्डर्स घेतल्याच जात नव्हत्या. विशेषतः ऍमेझॉनने हे तेव्हाच स्पष्ट केले होते. उलट 24 मार्चपूर्वी, ज्या अत्यावश्यक स्वरूपाच्या वस्तू नव्हत्या, अशांच्या ऑर्डर्सही ऍमेझॉनने रद्द केल्या होत्या. काही कंपन्यांनी घरातून काम करण्यासाठी स्क्रिन्स व कीबोर्ड्सची ऑर्डर दिली होती. तीदेखील रद्द करण्यात आली. फ्लिपकार्ट या कंपनीने ग्रोसरी व अन्य आवश्यक माल वगळता, इतर वस्तूंच्या डिलिव्हरीज देणे बंद केले. या दोन मोठ्या कंपन्या असून, त्यांचे कार्यक्षेत्र विस्तृत आहे. त्यामुळे त्यांना ऑपरेशन्स कमी करणे शक्य तरी झाले. इतर काही छोट्या कंपन्यांना ते शक्य नव्हते आणि तसे करणेही त्यांच्या दृष्टीने मृत्यूची घंटाच ठरणार होती.
भारतातील ऑनलाइन रिटेल उद्योगात विशिष्ट क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कंपन्या खूप आहेत. उदाहरणार्थ, चश्मे व आनुषंगिक गोष्टी विकणारी लेन्सकार्ट, फॅशनमधील मिंत्रा, सौंदर्य उत्पादनांमधील नायका (पूज्ञरर), फर्निचरमधील पेपरफ्राय आणि अंतर्वस्र क्षेत्रातील झिवामे ही कंपनी. या कंपन्या जी उत्पादने विकतात, ती सरकारने ज्या अत्यावश्यक वस्तूंना परवानगी दिलेली आहे, अशांमध्ये मोडत नाहीत. तरीसुद्धा यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न या वेबसाइट्स किंवा ऑनलाइन कंपन्या करत आहेत. उदाहरणार्थ, नायका ही कंपनी व्यक्तिगत स्वच्छता उत्पादने, हॅंड सॅनिटायझर्स, सॅनिटरी नॅपकिन्स वगैरेंच्या प्रिपेड ऑर्डर्स घेत आहे. अर्थात त्यांची डिलिव्हरी नेहमीपेक्षा अधिक दिवसांनी केली जाईल. लेन्सकार्टने स्वयंचलित उत्पादन प्रक्रिया प्रस्थापित केली आहे. ती चश्म्याच्या काचा आणि कॉंटॅक्ट लेन्सेस तीस टक्के सवलतीत देत आहे.
एक्सवायएक्सएक्स या पुरुषांच्या अंतर्वस्रांच्या डिजिटल ब्रॅंडने आपली वेबसाइट स्थगित केली आहे. लॉकडाउनचा कालावधी वाढल्यास, ई-कॉमर्स कंपन्यांची विक्री लक्षणीय प्रमाणात कमी हेणार आहे. कैब्झा या ई-कॉमर्स स्टोअरने व्हेंचर कॅपिटल कंपनीकडून गुंतवणूक आणण्याचे ठरवले होते. परंतु ही बोलणी स्थगित करण्यात आली आहेत. फाइंड या फॅशन ई-कॉमर्स कंपनीने ऑनलाइन डिलिव्हरी थांबवल्या आहेत. काउटलूट या फॅशन ई-कॉमर्स साइटने अत्यावश्यक मालाच्या भांडारात आपल्या वस्तू मिळण्याची सोय केली आहे. मात्र अत्यावश्यक वस्तूंच्या कंपन्यांना चांगल्या संधी मिळाल्या आहेत. कॉंटॅक्टलेस हेल्थ मॉनिटरिंग डिव्हायसेस बनवणाऱ्या डोझी या मेडटेक स्टार्टअपकडे जास्त ई-ऑर्डर्स आलेल्या आहेत. तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक प्रश्न सोडवता येतात. त्यामुळे दूरवरूनही काम करता येऊ शकते. करोनाचे संकट आले असले तरी, या संकटावर कल्पकतेने तंत्रज्ञानाच्या बळावर मात करता येऊ शकते, हे काही कंपन्या दाखवून देत आहेत. कंपन्यांनी त्यांचा कित्ता आवश्य गिरवावा.