नवी दिल्ली – करोनाचा मुकाबला करताना संपूर्ण राष्ट्र धैर्य आणि संयमाचे दर्शन घडवत आहे. गरीब आणि शोषितांची सेवा हा राष्ट्र सेवेचा सर्वोत्तम मार्ग असल्याचे महात्मा गांधी यांनी म्हटले होते. याचे स्मरण करत मानवतेची सेवा करणाऱ्या या संघटनांच्या निष्ठा आणि बांधिलकीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली. समाज कल्याणासाठी कार्य करणाऱ्या संस्थांच्या प्रतिनिधींशी पंतप्रधानांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिग द्वारे संवाद साधला.
मानवी दृष्टीकोन, अनेक लोकांपर्यंत पोहोचण्याची व्यापक क्षमता आणि सेवाभावी वृत्ती ही या संघटनांची तीन आगळी वैशिष्ट्ये आहेत. देश एका अभूतपूर्व पेचप्रसंगातून जात असून या संस्थांची सेवा आणि संसाधने यांची देशाला नितांत आवश्यकता आहे.
गरिबांना आवश्यक त्या वस्तूंची व्यवस्था करण्यासाठी आणि रुग्णांची सेवा करण्यासाठी स्वयंसेवक तसेच गरजू आणि रुग्णांना वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठीही या संस्था मोठी भूमिका बजावू शकतात. अशी सूचना त्यांनी केली. या संकटावर मात करण्यासाठी देशाला अल्प कालीन त्याच बरोबर दीर्घ कालीन दृष्टीकोनाची गरज त्यांनी अधोरेखित केली.
अंधविश्वास ,दिशाभूल करणारी माहिती रोखण्यासाठी या संस्थानी मोठी भूमिका बजावावी. भाबडा विश्वास ठेवत त्याच्या नावाखाली लोक एकत्र येत असून सोशल डिस्टन्सिंगचे नियम मोडत आहेत. करोनाच्या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग राखण्याचे महत्व पोहोचवणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
खडतर परिस्थितीत निपुणतेने मार्गदर्शन करत असल्याबद्दल या समाज सेवी संघटनांच्या प्रतिनिधीनीं पंतप्रधानांच्या नेतृत्वाची प्रशंसा केली. सरकारने उचललेल्या तत्पर पावलांची प्रशंसा करून विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्या प्रभावी ठरत आहेत, असे त्यांनी सांगितले.
डिजिटल माध्यमातून जागृती अभियान,गरजूंना वैद्यकीय मदत, आवश्यक वस्तू,अन्न, सॅनीटायझर, औषधे पुरवण्याबाबत या संस्थांच्या सध्या सुरु असलेल्या कार्याबाबतही त्यांनी माहिती दिली.