नवी दिल्ली – अचानक उद्भवलेला “कोविड-19′ साथीचा आजार आणि देशव्यापी लॉकडाऊनमुळे निर्माण झालेले भीतीचे वातावरण लक्षात घेत, दळणवळण मंत्रालय, टपाल विभाग, टपाल आयुर्विमा संचालनालयाने मार्चमध्ये देय असलेल्या प्रीमियमला कोणतेही दंड शुल्क न आकारता 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
“पीएलआय’ संचलनालयाने म्हंटले आहे की, जरी अनेक टपाल कार्यालये अत्यावश्यक सेवा म्हणून सुरु असली तरीदेखील टपाल आयुर्विमा/ ग्रामीण टपाल आयुर्विम्याच्या ग्राहकांना प्रिमियम भरण्यासाठी टपाल कार्यालयात पोहचण्यास अनेक अडचणी येत आहेत. म्हणूनच सर्व पीएलआय/आरपीएलआय ग्राहकांच्या सोयीसाठी प्रीमियम देयकाचा कालवधी वाढवण्यात आला आहे.
ज्यांना चालू महिन्यात प्रिमियम भरणे शक्य झाले नाही अशा अंदाजे 13 लाख विमा धारकांना (5.5 लाख पीएलआय आणि 7.5 लाख आरपीएल आय) या निर्णयाचा लाभ होणार आहे. मागील महिन्यात प्रीमियम भरलेल्या 42 लाख विमा धारकांच्या तुलनेत या महिन्यात आजपर्यंत केवळ 29 लाख विमा धारकांना प्रीमियम भरणे शक्य झाले आहे.
पोर्टलवरील नोंदणीकृत ग्राहकांना पीएलआय ग्राहक पोर्टलचा वापर करून प्रीमियम भरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.