मुंबई: कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी गावबंदी करण्याचे प्रकार घडत आहेत. गावकऱ्यांनी रस्त्यात दगड, पाण्याचा टाक्या आणि झाडेझुडपे टाकून रस्ते बंद केले आहेत. मात्र, अशा पध्दतीने गावबंदी केली तर कारवाई करू असा इशारा रायगडचे पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी दिला आहे.
मुंबईतील करोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन चाकरमान्यांनी कोकणात गावची वाट धरली आहे. मिळेल त्या साधनांनी ते आपले गाव गाठत आहेत. मात्र, मुंबईतून गावात दाखल होणाऱ्या या मुंबईकरांची गावकऱ्यांना धास्ती वाटू लागली आहे. एखाद्या व्यक्तीला करोना विषाणूची बाधा असेल तर गावातही करोनाचा प्रादुर्भाव होईल अशी भिती त्यांना वाटते आहे. त्यामुळे अनेक गावात परवानगीशिवाय प्रवेश नाही असे बोर्ड लागल्याचे दिसून येत आहेत. गावाकडे येणारे मार्गच काहींनी दगड, पाण्याचे पिंप, काटेरी झुडपे आणि झाडे टाकून बंद केले आहेत. काही ठिकाणी गावच्या हद्दीत तर पाहारेकरीही ठेवण्यात आले आहेत. मुंबईकरांना गावाकडे येऊ नका अशा सुचनाही दिल्या जात आहेत. याबाबतचे वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे.
ज्या गावात अशी गावबंदी करण्याचा प्रयत्न होईल. त्या गावातील सरपंच आणि पोलीस पाटील यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराच पारस्कर यांनी दिला आहे. अशी बेकादेशीरपणे गावबंदी करण्याचा प्रयत्न केला तर जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.