नवी दिल्ली: कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. देशात अनेक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत. याच संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. कोरोनापासून वाचायचं असेल तर विलगीकरणावर अधिकाअधिक भर द्यावा असं आवाहन इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च संस्थेच्या साथी आणि संसर्गजन्य रोग विभागाचे राष्ट्रीय प्रमुख पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांनी केलं आहे.
एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी कोरोनाची लागण होऊ नये यासाठी काय खबरदारी घ्यावी, कोरोनावर औषधांसाठी जगभरात काय प्रयत्न सुरु आहेत, कोरोनावर तापमानाचा काही परिणाम होणार का, लॉकडाऊनचं टायमिंग योग्य आहे का? अशा अनेक प्रश्नांची त्यांनी उत्तरं दिली. भारताची लोकसंख्या 135 कोटींच्या घरात आहे. एवढ्या मोठ्या देशात रोज शंभरने कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असेल तर ते किती भीतीदायक आहे हे तारतम्यानं विचार करुन ठरवा. भारतानं आपलं प्रत्येक पाऊल योग्येवेळी उचललेलं आहे. अजूनही कम्युनिटी ट्रान्समिशन सुरु झालेलं नाही. दोन चार केसेसमधून हा निष्कर्ष काढणं चुकीचं ठरेल. कारण अनेकदा या केसेसच्या नोंदणीत काही वेगळे घटक कारणीभूतही असू शकतात, असं डॉ. गंगाखेडकर यांनी सांगितलं.
कोरोनाचा सामना करण्यासाठी जी महत्त्वाची आणि कठोर पावलं उचलण्याची गरज होती, ते आपल्या सरकारने केलं आहे. महाराष्ट्र सरकारने तर एक दिवस आधीच लॉकडाऊन केलेलं होतं. महाराष्ट्र सरकारने घेतलेली अनेक पावलं इतर राज्यांच्या पुढची आहेत. मात्र लोकांनी लॉकडाऊनला खूप गंभीरतेने घेणे गरजेचं आहे. लॉकडाऊनला सहकार्य न करुन सरकारचे प्रयत्न पाण्यात घालवू नका असं आवाहन डॉ. गंगाखेडकर यांनी केलं आहे.