बाजारातील वर्दळ थंडावली : शेतकऱ्यांसह विक्रेत्यांची “करोनाचेपी’
पुणे – सध्या जगभर करोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. आता गावगाड्यांतील अर्थकारण कोलमडून पडले आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावांचे अर्थकारण असलेल्या आठवडे बाजारावर करोनाचे सावट गडद झाले आहे. जिल्ह्यातील सुमारे 1400 गावांपैकी चारशे गावांतील बाजाराला फटका बसला आहे. यामुळे गेल्या आठवडाभरात सुमारे 4 ते 5 कोटी रुपयांचा जिल्ह्यातील बाजारपेठांना फटका बसला आहे.
गेल्या पंधरा दिवसांपूर्वी करोनाचा संसर्ग पुणे, मुंबईपुरता सीमीत होता. त्यानंतर पुणे, पिंपरी- चिंचवड शहरानंतर करोनाचे सावट गावागावांत पोहचले आहे. पुणे जिल्ह्यातील अनेक नागरिक, तरूण परदेशवारी करत आहेत. त्यात अनेकांच्या रोजगारवाटा परदेशावर अवलंबून आहे. त्यामुळे पुणे शहरानंतर जिल्ह्यातील शिरूर, बारामती, खेड तालुक्यात करोनाचे संसर्ग घोंगावले आहे. त्यामुळे प्रशासनाने याची दक्षता घेत तपासण्या केल्या.
जिल्ह्यातील 13 तालुक्यांत सुमारे 400 गावांत आठवडे बाजार भरत आहे. या प्रत्येक बाजारातून सरासरी चार ते पाच लाख रुपयांची उलाढाल होत आहे. एका बाजारांवर सुमारे 70 ते 80 विक्रेते अवलंबून आहेत. त्यांच्या माध्यमातून एका बाजारात 4 ते 5 लाख रुपयांची उलाढाल गृहीत धरल्यास 400 गावांतील बाजाराला सुमारे 4 ते 5 कोटी रुपयांचा फटका एका आठवड्यात बसला आहे.
एका बाजारात परिसरातील 10 ते 15 गावांतील ग्राहक खरेदीसाठी येतात. भाजीपाला, धान्य, कटलरी, कडधान्ये आदींची विक्री केली जात आहे. तसेच बरेच विक्रेते मालवाहतूक गाडीने बाजारात येतात. त्यांचा खर्च निघणे देखील जिकीरीचे झाले आहे. या विक्रेत्यांना चांगलाच आर्थिक फटका बसला आहे.
शेतीमालाची विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे शेतकऱ्यांची रोजीरोटी या बाजाराशी निगडीत आहे. शेतीमालाची आवक मोठ्या प्रमाणात बाजारात येत आहे. मात्र, त्यातुलनेत ग्राहकांची खरेदी क्रयशक्ती घटल्यामुळे शेतीमाल मातीमोल होत आहे.
दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी या कचाट्यातून पिळून गेल्यानंतर चिनी बनावटीचा करोना शेतकऱ्यांना घायकुतीला आणला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निघणे मुश्कील झाला आहे. करोनामुळे शेतकऱ्यांच्या उरात धडकी भरली आहे. त्याचबरोबर विक्रेत्यांनी धास्ती घेतली आहे.
सधन तालुके अन् मरगळलेली गावे
जिल्ह्यातील बारामती, शिरूर, हवेली, खेड, दौंड, पुरंदर, आंबेगाव, जुन्नर या तालुक्यांत मोठ्या लोकसंख्येच्या गावांत आठवडे बाजार भरत आहे. त्यात बाजारपेठेशी निगडीत असलेल्या या गावांशी परिसरातील 10 ते 15 गावे कक्षेत येत आहे. त्या गावांमधील आठवडे बाजारात मरगळ आलेली आहे. त्यामुळे ग्रामीण अर्थकारणाचा कणा असलेली आठवडे बाजार मरगळलेले आहेत. जिल्ह्यातील किमान सहा ते सात सधन तालुक्यांतील मोठ्या गावांत करोनाची बाधा आता अप्रत्यक्षरित्या घराघरांत पोहचली आहे. त्यामुळे चार ते पाच कोटी रूपयांचा फटका करोनामुळे बसला आहे. यातून आता कधी सावरणार, अशी चिंता शेतकरी, विक्रेते, ग्राहकांना सतावत आहे.