जिल्हाधिकारी नवलकिशोर राम; फक्त शंभर लोकचं बोलवा
पुणे – करोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून काढण्यात येणाऱ्या आदेशांमध्ये मोठ्या प्रमाणावर विस्कळीतपणा असल्याचे समोर येऊ लागले आहे. एकीकडे मंगल कार्यालयांना नोटीसा बजावून बंद ठेवा अन्यथा कारवाई करू, असा इशारा महसूल प्रशासनाने दिला आहे. दुसरीकडे मात्र लग्नसमारंभांवर कोणतीही बंदी घातलेली नाही, असे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी स्पष्ट केले आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून विविध आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार शहरातील मंगल कार्यालयांना तलाठ्यांच्या मार्फत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. कार्यालये 31 मार्चपर्यंत बंद ठेवावीत, तसेच या आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचा इशारा या नोटिसीच्या माध्यमातून मंगल कार्यालय चालकांना देण्यात आला आहे. त्यामुळे अनेक मंगल कार्यालय चालकांनी लग्नाचे घेतलेले बुकिंग अचानक रद्द केले. परिणामी, अनेक जण अडचणीत आले आहेत. एक-दोन दिवसांवर लग्न आल्यामुळे त्यांच्यापुढे प्रश्न निर्माण झाला आहे.
याविषयी विचारले असता जिल्हाधिकारी राम म्हणाले की, लग्न समारंभांवर कोणतेही बंदी घालण्यात आलेली नाही. लग्न समारंभ हा वैयक्तिक कार्यक्रम आहे. मात्र, अशा कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणावर गर्दी करू नये. वधू पक्ष आणि वर पक्ष अशा दोन्हीकडील मंडळींनी फक्त शंभर लोकांना आमंत्रित करावे, असे यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांनीही असे कार्यक्रम करताना फार गर्दी होणार नाही, यांची काळजी घ्यावी.