पिंपरी-चिंचवड शहर वेगाने विस्तारत आहे. वाढते नागरीकरण, लोकसंख्या वाढ आणि तुलनेत कमी पडणाऱ्या सुविधा अशी परिस्थिती सध्या पाहण्यास मिळत आहे. नागरिकांना किमान मूलभूत नागरी सुविधा मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागतो आहे. रस्ते, पाणी, आरोग्य, वीज आदी विषयांशी संबंधित छोटे-छोटे प्रश्न सुटावेत, अशीच सर्वसामान्यांची माफक अपेक्षा आहे. या समस्या मांडण्यासाठी आम्ही आपल्याला व्यासपीठ उपलब्ध करून देत आहोत.
खराळवाडी येथील पदपथावरील अतिक्रमण हटविण्याची मागणी
पिंपरी – खराळवाडी येथील जुन्या मुंबई-पुणे महामार्गाच्या लगत असलेल्या पदपथावर चारचाकी व दुचाकी वाहने पार्क केली जात आहेत. तसेच पदपथावर विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना रहदारीच्या रस्त्याने ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे त्यांच्या जिवाला अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. तर काही वाहनचालक खरेदीकरण्यासाठी रस्त्यातच वाहने पार्क करत आहेत. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. तसेच पदपथावर मोठ-मोठे खड्डे पडले असल्याने याचा परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. महापालिका प्रशासनाच्या अतिक्रमण विभागाने याची दखल घेऊन रस्त्याच्या पदपथावरील अतिक्रमण लवकरात लवकर हटावावेत, अशी मागणी स्थानिकांतून होत आहे.
– एस.एन.कुंभार, नागरिक
स्पीड ब्रेकर काढल्याने अपघात
चिंचवड – चापेकर चौक ते वाल्हेकरवाडी रस्त्यावरील हॉटेल रानमळा येथील स्पीड ब्रेकर काढल्याने येथून ये-जा करणारे वाहने सुसाट वेगाने जात आहेत. त्यामुळे येथे अपघात होत आहेत. येथून ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे. वाहनांचे स्पीड लक्षात घेता येथे स्पीड ब्रेकर लावणे गरजेचे आहे. तरी येथील मार्गावर स्पीड ब्रेकर लावण्यात यावे, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
– संजोग जंगम, वाल्हेकरवाडी
पुलाचा कठडा त्वरित दुरुस्त करा
पिंपळे सौदागर – येथील पवना नदीवरील पुलाच्या कठड्याला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने येथील पुलाचा कठडा तुटला आहे. त्यामुळे वहनचालकांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. जर रात्री प्रवास करताना वाहनचालकाच्या लक्षात आले नाही तर अपघात होऊ शकतो. त्यामुळे महापालिका प्रशासनाने याची दखल घेऊन या कठड्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून तसेच वाहनचालकांकडून होत आहे.
– बी. एन. राजे, पिंपरी