निर्भया प्रकरणातील गुन्हेगारांनी “दया दाखवावी’ असा अर्ज केल्याचे वृत्तपत्रात वाचून प्रचंड हसू आले आणि प्रक्रियेची किवही करावीशी वाटली. म्हणजे माफी मागणे हा प्रक्रियेचा भाग आहे हे मान्य केलं तरी ज्या निष्ठुरपणे त्यांनी बलात्कार आणि जीव घेणं हे गुन्हे केले. त्यांना माफी का द्यायची? माफीचा अर्थ काय? ज्याच्याकडून कळत-नकळत चुकीचे शब्द तोंडून गेले असतील, कामाच्या घाईगर्दीत लहानशी चूक झाली असेल किंवा एखाद्या तत्त्वासाठी वागलं गेलं असेल त्यानं “मला माफ करा’, “सॉरी’ “पुढच्यावेळी काळजी घेईन’ असं म्हणणं वेगळं!
आणि ज्यानं मोहापायी, लोभापायी- सत्ता, पैसा, पद, गुर्मी, अहंकार यामुळे दुसऱ्यांचं मन दुखावलं असेल त्याला शारीरिक इजा झाली असेल त्यानं माफी मागणं किंवा “वाईट वाटलं असेल तर मला माफ करा’ अशी नाटकी माफी मागणं हे वेगळं. नाटकी माफी म्हणजे अगोदर लाथ मारायची, थप्पड मारायची आणि नाटकीपणानं वर “अरे, चुकून झालं. डास मारताना लागलं’ असं म्हणायचं असा अर्थ झाला. “चुकीला माफी नाही’ असं म्हणत चित्रपटात सहकाऱ्यांना गोळ्या घालणारा खलनायक आपण पाहतो पण तो स्वतःवर वेळ आल्यावर मात्र माफी मागतो. कारण जीव गमावू नये असं त्यालाही वाटत असतं.
दिवसभरात आपण कित्येक व्यवहार करतो. कपडे धुऊन, इस्त्री करून घेणे, चपला शिवणे, भाजी, बस-रिक्षा, मंदिर-हॉटेल, ऑफिस, सोसायटी, किराणावाला प्रत्येकाला निदान 50-100 माणसं तरी भेटतातच. विचारांची देवाण-घेवाण होते. हसणं-बोलणं होतं. कधीतरी वाद-मतभेद होतात. उगाचच वेडेवाकडे शब्द तोंडून जातात. काहीवेळा जुने प्रसंग आठवून आपण कडू, अपमान करणारं, तिखट बोलतो. मग आपलं मन आपल्यालाच कुरतडत बसतं. “मी असं बोलायला, वागायला नको होतं.’
सरळ त्या माणसाला “सॉरी’ म्हणून मोकळं व्हावं. म्हणजे आपल्याही मनात कटू बोलल्याचं राहत नाही आणि जर प्रामाणिकपणे, कळकळीने हात हातात घेऊन आपण म्हणालो, आवाज सद्गदित असला, डोळ्यात पाणी तरळलं तर समोरच्यालाही ती भावना खरी असल्याचं समजतं. तोही त्याच सहजपणानं माफ करतो. मग दोघांनी कटिंग चहा प्यावा, हसत निरोप घ्यावा.
गुर्जिएफ नावाचा परदेशी गुरू होता. त्यांचे वडील ते लहान असतानाच वारले. मरताना वडील म्हणाले, “हे बघ घटना घडल्यावर किंवा कोणी बोलल्यावर लगेच प्रतिक्रिया देऊ नको. विचार करून, परिस्थिती पाहून, त्यावर चिंतन-मनन करून बोल. मी तुला इतर काही देऊ शकत नाही म्हणून हा सल्ला देतोय.’
मग गुर्जिएफ मनावरून घेऊन तसंच वागू लागले. कोणी अपमानास्पद, तिरकस किंवा राग आणणारं बोललं तरी ते म्हणत- “याचं उत्तर मी उद्या देईन.’ विचार केल्यावर त्यांना त्याचं म्हणणं पटलं तर ते सांगायचे, “हो. तुमचंच बरोबर होतं. मी चुकीचा वागलो होतो.’ खरं तर गुर्जिएफच्या वडिलांचा सल्ला प्रत्येकानं मनावर घेतला तर मतभेद वादविवाद होतील पण हातापायीवर येणारी भांडणं होणार नाहीत. आपण दुसऱ्याचीही बाजू सहज समजून घेऊ शकू.
समाजात दोन पक्ष, दोन जाती, दोन धर्म यात मतभेद असणारच. फक्त ते मनभेद होऊ देऊ नयेत. हे काम जाणत्या नेत्यांचं आहे. पण तेच भांडणं लावू लागले तर? तर अनुयायांनीच त्यांना सांगायचं- जर तुम्ही मतभेद असताना सत्तेसाठी एकत्र येऊ शकता तर आम्ही का एकमेकांत भांडू?’ सामंजस्यानं, सलोख्यानं, गोडव्यानं अनेक प्रश्न कायमचे सुटू शकतील. पण आपण चुकलं तर माफी मागायला तयार असलं पाहिजे आणि दुसऱ्यानंही मनात काही न ठेवता माफ करायची तयारी दाखवली पाहिजे. अर्थात फेसबुकच्या या “ट्रोलिंग’ करण्याच्या काळात हे खूपच अवघड आहे पण अशक्य मात्र मुळीच नाही. प्रयत्नांना तर सुरुवात करा.
सहजानंद