नवी दिल्ली – दिल्ली विधानसभेच्या निवडणूकीमध्ये कॉंग्रेसने पराभवाचे नवीन रेकॉर्ड प्रस्थापित केले आहे. एकूण मतदानापैकी 5 टक्क्यांच्याही खाली मतदान पक्षाच्या वाट्याला आले आहे. तर निवडणूक उभ्या केलेल्या एकूण उमेदवारांपैकी तब्बल 63 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.
ज्या दिल्लीवर शीला दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस पक्षाने सलग 15 वर्षे राज्य केले ह्जोते. त्याच दिल्लीमध्ये कॉंग्रेस पक्षाला खाते उघडताही आलेले नाही. ही नामुष्कीची वेळ कॉंग्रेसवर विधानसभेच्या निवडणूकीत सलग दुसऱ्यांदा आली आहे. अरविंद सिंह लवली यांनी गांधी नगर, देवेंदर यादव यांनी बाडली मतदारसंघात आणि अभिषेक दत्त यांनी कस्तुरबा नगर मतदार संघातून आपले डिपॉझिट वाचवण्यात यश मिळवले आहे.
प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष सुभाष चोप्रा यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारली. ‘कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी कष्ट घेतले मात्र यश आले नाही. पराभवातून नवीन शिकायला मिळते, असे चोप्रा म्हणाले. कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी कष्ट घेतले मात्र यश मिळाले नाही. कॉंग्रेससाठी हा संघर्षाचा काळ आहे. आम्हाला दिल्लीचा जनादेश मिळालेला नाही याची संपूर्ण जाणीव आहे. निवडणुकीतला प्रत्येक पराभव शिकवतच असतो. या पराभवामुळे आमचे कार्यकर्ते नाराज नाही. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना शुभेच्छा देतो. दिल्लीच्या विकासावर कॉंग्रेस नेते, कार्यकर्ते लक्ष ठेवणार आहे. असे मत सुभाष चोप्रा यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
निवडणुकीतील विजेत्या उमेदवाराला मिळालेल्या एकूण मतांच्या एकषष्ट्यांश मते न मिळाल्यास संबंधित उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होते. कॉंग्रेसच्या बहुतेक उमेदवारांना आपापल्या मतदारसंघात एकूण मतांपैकी 5 टक्क्यांहून कमी मते मिळाली. यामध्ये दिल्ली विधानसभेचे माजी सभापती योगानंद शास्त्री यांच्या कन्या प्रियांका सिंह आणि पक्षाच्या प्रचार कमिटीचे अध्यक्ष किर्ती आझाद यांच्या पत्नी पूनम आझाद यांचाही समावेश आहे. आझाद यांना केवळ 2,604 मते मिळाली.