प्रशांत जाधव
व्यावसायिकाकडे चारचाकी गाडीची मागणी; “भेट’ न मिळाल्यास गुन्ह्यात अडकवण्याची धमकी
सातारा – खटाव तालुक्यातील मोक्याच्या पोलीस ठाण्यात काही वर्षापूर्वी सेवा बजावलेल्या आणि सध्या साताऱ्यातील एका बड्या अधिकाऱ्याची मर्जी मिळवणाऱ्या फौजदाराचा तोरा भलताच वाढला आहे. या फौजदाराने आपल्या कामगिरीचा “प्रकाश’ नुकताच पाडला आहे. खटाव तालुक्यात, सांगली जिल्ह्याच्या सीमेजवळ असलेल्या एका गावातील वाळू व्यावसायिकाकडून चारचाकी गाडी मागण्याचा प्रताप या फौजदाराने केल्याचे उजेडात आले आहे. ही “भेट’ मिळाली नाही तर जुन्या गुन्ह्यांची फाईल “ओपन’ करून अडकवण्याची धमकी या फौजदाराने दिली आहे. त्यामुळे घाबरलेल्या व्यावसायिकाने आपली व्यथा थेट “प्रभात’कडे मांडली.
सातारा जिल्हा पोलीस दलात अनेक वर्षे शिपाई, हवालदार म्हणून काम केल्यावर या महाभागाची पोलीस उपनिरीक्षकपदी बढती झाली. अधिकारीपदाबरोबरच या महाशयांचा मानमरातब आणि प्रतिष्ठाही वाढली. मात्र, या पदाची प्रतिष्ठा राखण्याऐवजी हे महाशय वर्दीचा धाक दाखवून लोकांच्या खिशात हात घालू लागल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
या महाभागाने केवळ सामान्य लोकांनाच नव्हे तर पोलीस दलातील कनिष्ठांनाही वेठीस धरल्याची चर्चा आहे. गेली अनेक वर्षे दप्तरी म्हणून काम केल्याने मिळालेल्या अनुभवाचा उपयोग चांगल्या कामकाजासाठी करण्याऐवजी लोकांना कायद्याची भीती दाखवण्यात, धाकदपटशा करून “मलिदा’ लाटण्यासाठीच केला जात आहे.
जिल्हा पोलीस दलात “विशेष’ वजन मिळवलेल्या या फौजदाराने स्वकियांना वेठीस धरण्याचे शौर्य अनेकदा दाखवले आहे. कायद्याच्या ज्ञानाचा पोलीस दलाला फायदा करून देण्याऐवजी गैरवापर करण्याची या फौजदाराची प्रवृत्ती आहे. पैशाची धुंदी आणि वर्दीची घमेंड असल्याने त्याच्याकडून गैरकृत्ये होत आहेत, असे पोलीस दलातील जुनेजाणत्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. या फौजदाराचा असाच अनुभव खटाव तालुक्यातील वाळू व्यावसायिकाला नुकताच आला. काही महिन्यांपूर्वी या फौजदारांची व संबंधित वाळू व्यवसायिकाची भेट आडवळणाच्या एका गावात झाली.
त्यावेळी शेतातील कामासाठी चारचाकी गाडी देण्याची मागणी फौजदाराने वाळू व्यावसायिकाकडे केली. “साहेबाच्या नादाला कशाला लागा’, असे म्हणत त्या व्यावसायिकाने होकार देत वेळ मारून नेली. या भेटीला बरेच दिवस उलटले तरी त्या व्यावसायिकाने चारचाकी गाडीचे नावच न काढल्याने फौजदाराने फर्मानच सोडले. गाडीच्या खरेदीसाठी 60 ते 70 हजार रुपये मी देतो, उर्वरित रक्कम घालून आता तरी गाडी दे, असे फौजदाराने सांगितले तरी वाळू व्यावसायिकाने काहीच प्रतिसाद दिला नाही.
त्यामुळे पिसाळलेल्या फौजदाराने, “तू गाडी दिली नाहीस तर अडचणीत येशील, तुझ्या जुन्या केसेस ओपन करून तुला अडकवीन’, अशी थेट धमकीच दिली. त्यामुळे घाबरलेल्या व्यावसायिकाने फोनाफोनी केली. मात्र, त्याच्यावर कोणताही गुन्हा प्रलंबित नसल्याचे त्याला सांगण्यात आले. त्यानंतर त्या व्यावसायिकाने “प्रभात’कडे आपले गाऱ्हाणे मांडले.
वास्तविक “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीद आहे. अनेक कर्तव्यकठोर, निष्ठेने काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी या दलाची शान वाढवली आहे. मात्र, आपल्या या गैरकृत्याने या फौजदाराने जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शरमेने माना खाली घालण्याची वेळ आणली आहे. जिल्हा पोलीस दलात सुसंस्कृत, निर्भीड, स्वच्छ प्रतिमेचे अनेक अधिकारी व कर्मचारी आहेत तर त्याउलट “आपल्याला जाब विचारणारा कोणी नाही, आपण कोणावरही कारवाई करू शकतो’ अशा घमेंडीत हा अधिकारी आहे. ही बाब पोलीस दलासाठी चिंताजनक आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे.
शेतीची औजारे मागितली पण…
याच फौजदाराने काही वर्षांपूर्वी एका शहरातील फॅब्रिकेशन व्यावसायिकाला नांगर, पलटी अशी शेतीची औजारे मागितली होती. आपण कष्टाने पैसे कमावतो, तरीही पोलीस अधिकारी आपल्याला त्रास देतो, हे सहन न झाल्याने संबंधित व्यावसायिकाने साताऱ्यातील नातेवाइकाला याबाबत माहिती दिली. त्या नातेवाइकाने वरिष्ठांकडे दाद मागितल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले अन् फौजदार महाशयांनी, “सध्या औजारे नकोत, नंतर लागली तर करून घेतो’, असे सांगून माघार घेतली होती.