मोर्चा, धरणे आंदोलन मागे
मंचर (प्रतिनिधी) – घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील तहसील कार्यालयावर पश्चिम आदिवासी भागातील आदिवासी, कष्टकरी, शेतमजूर, निराधार पेन्शनधारक बांधवांनी किसानसभेच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चेकरांच्या विविध मागण्या प्रशासनाने मंगळवारी (दि. 28) मान्य केल्यामुळे धरणे आंदोलन मागे घेण्यात आले आहे.
यावेळी वनविभागाने पेसा कायद्याअंतर्गत समावेश झालेल्या गावांच्या ग्रामसभेची मान्यता न घेता सुरु केलेल्या सर्व आंबेगाव तालुक्यातील जंगल जमिनीला संरक्षक भिंत घालण्याच्या कामांना स्थगिती तसेच संरक्षक भिंतीचे काम सुरु ठेवावे कि बंद करावे, याचा निर्णय गावाच्या ग्रामसभेतच केला जावा.
आदिवासी जनतेची फसवणूक करुन जे वन कर्मचारी बेकायदेशीर दंड वसूल करण्यासाठी प्रयत्न करत होते. अशा कर्मचाऱ्यांविषयी चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नेमून 15 दिवसात अहवाल देईल व कर्मचारी दोषी आढळल्यास त्यावर कारवाई केली जाईल. रॉकेल नियमित ग्रामीण भागातील लोकांना मिळावे. यासाठीचा प्रस्ताव शासनस्तरावर पाठवला जाईल. ज्या लोकांना गॅस मिळाला नाही व रॉकेल मिळत नाही, अशा लोकांकडून हमीपत्र घेऊन त्यांना रॉकेल दिले जाईल. प्रत्येक रेशन दुकानात तक्रारवही, धान्याचे नमुने, दुकानाचा फलक लावण्याचे आदेश दुकानदारांना व दक्षता समिती स्थापन करण्याचे आदेश ग्रामपंचायतींना दिले जातील. पुढील एक महिन्यात आदिवासी भागात रोजगार हमी कायद्याअंतर्गत मागेल त्याला काम दिले जाईल. ज्या-ज्या गावातून मागणी येईल तेथे रोजगार हमीतून पडकईची कामे सुरु केली जातील.
राजपूर येथे 1 वर्षापूर्वी काम मागणीचे अर्ज मजुरांनी देऊन काम सुरु न केल्याबद्दल सबंधित मजुरांना बेरोजगार भत्ता देणे बाबत कारवाई केली जाणार आहे. प्रत्येक गावाला सामुहिक वनहक्क कसा मिळेल यासाठी कालबद्ध कार्यक्रम करण्याबाबत आदिवासी प्रकल्प कार्यालय यांच्यासोबत स्वतंत्र बैठक होणार आहे. महाराष्ट्र शासनाने घोषित केल्यानुसार 1हजार रुपयांप्रमाणे निराधार पेन्शन सप्टेंबर 2019 या महिन्यापासून मिळणार. नवीन पेन्शन धारकांना दारिद्य्र रेषेचा दाखला देण्यासाठी ग्रामसेवक व उत्त्पन्नाचा दाखला देण्यासाठी तलाठी यांना आदेश दिले जातील.
आदिवासी भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात यापुढे एकतरी निवासी डॉक्टर असतील. जे डॉक्टर राहणार नाहीत त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. तळेघर येथील सुरु असलेली 108 रुग्णवाहिका सुरु करण्यात आली आहे. इत्यादी मागण्या मान्य करण्यात आल्या. आंदोलनाचे नेतृत्व किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष नाथा शिंगाडे, सचिव डॉ. अमोल वाघमारे, उपाध्यक्ष महेंद्र थोरात, तालुकाध्यक्ष कृष्णा वडेकर, सचिव अशोक पेकारी, उपाध्यक्ष राजू घोडे, अमोद गरुड यांनी केले. किसान सभेचे व एसएफआय संघटनेचे तालुका पदाधिकारी अशोक जोशी, ज्ञानेश्वर मेमाणे, रामदास लोहकरे, सुभाष भोकटे, गणेश काटले, दत्ता गिरंगे, देविका भोकटे, जिजाबाई केंगले, नंदा मोरमारे, लक्ष्मण मावळे, सुरेश आंबवणे, पुंडलिक असवले, रामभाऊ भांगे, शैला आंबवणे, अविनाश गवारी, तृप्ती दुर्गुडे, समीर गारे, सागर पारधी, अनिल सुपे, रोहिदास गभाले यांनी यासाठी परिश्रम घेतले.