कराड – खुन्नस दिल्याच्या कारणावरून चिडून जावून नरेंद्र अनिल कदम (वय 22, रा. ओगलेवाडी, ता. कराड) याचा चाकूने छातीत वार करून खून केल्याची ओगलेवाडीतील पळसे वाडा येथे शनिवारी सायंकाळी 6.30 च्या सुमारास घडली.
या प्रकरणी ऋषिकेश सुभाष पिसाळ (वय 22, रा. हजारमाची, ता. कराड) याच्या फिर्यादीवरून कराड शहर पोलिसांनी कुणाल सुभाष पळसे (वय 21), शुभम शैलेंद्र आंबेकर (वय 19), सागर सुखदेव पळसे (वय 25), सचिन कृष्णात पळसे (वय 42, सर्व रा. हजारमाची) यांना अटक करून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी चौघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना बुधवार, दि. 29 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याबाबत माहिती अशी, ऋषिकेश पिसाळ हा शनिवारी सायंकाळी 5.45 च्या सुमारास जिमला जात असताना नरेंद्र कदम नवीन ऍक्टिव्हा गाडी घेऊन भेटला.
दोघे कराडकडे निघाले असता ओगलेवाडीतील पळसे वाडा येथे अल्पवयीन मुलाकडे पाहून, तो नेहमी खुन्नसने पाहतो, असे म्हणत नरेंद्रने दुचाकी थांबवली. त्यावेळी परिसरातील युवक तेथे आले. ते लाकडी दांडक्याने नरेंद्रला मारण्यासाठी सरसावले असता ऋषिकेश मध्ये आला.त्यावेळी कुणालने मारलेले दांडके ऋषिकेशच्या हातावर लागले. त्यानंतर शुभम, सचिन, सागर व अन्य दोघांनी ऋषिकेशला पकडून ठेवून लाकडी दांडक्याने मारहाण केली.
त्यावेळी नरेंद्रने दांडक्याने कुणालला मारले. त्यामुळे कुणालने घरातून चाकू आणून नरेंद्रच्या छातीत खुपसला. त्यामुळे नरेंद्र रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पाहून सर्व जण पळून गेले. ऋषिकेशने काही युवकांच्या मदतीने नरेंद्रला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू होण्यापूर्वीच नरेंद्रचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर तपास करत आहेत.