नवी दिल्ली : एखाद्या ध्येयासाठी संघर्ष करत असताना अहिंसेचा अंगिकार करावा आणि घटनात्मक तरतूदींना घट्ट धरून रहावे, असे आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशवासियांना विशेषतः युवावर्गाला केले.
प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला देशवासियांना उद्देशून केलेल्या संदेशामध्ये एखदी गोष्ट बरोबर किंवा चुकीची असल्याचा निर्णय राज्यघटनेच्या निकषावरच घेण्याचे आवाहन केले. विधिमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायपालिका परस्परांना जोडलेले आणि परस्परांवर अवलंबून असतात. देशातील जनताच प्रजासत्ताकाचे वाहक असतात. सरकार आणि विरोधक दोन्हींची भूमिका महत्वाची असते.
देशाच्या विकासासाठी या दोघांनी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे, यावर राष्ट्रपतींनी भर दिला. राष्ट्रनिर्माणाच्या प्रयत्नांमध्ये महात्मा गांधींची तत्वे आजही लागू होत आहेत. 26 जानेवारी या दिवसाला अनन्यसाधारण महत्व आहे. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी 1930 ते 1947 या काळात याच दिवशी “पूर्ण स्वराज दिवस’ साजरा केला जायचा.
राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला जसे अधिकार दिले आहेत, तशाच न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाला बांधील राहण्याची जबाबदारीही दिली आहे. सत्य आणि अहिंसेच्या संदेशाद्वारे आपल्या दैनंदिन आचरणाचे पुनरावलोकन करण्यातूनच महात्मा गांधीजींची 150 वी जयंती आपण खऱ्या अर्थाने साजरी करू, असे आवाहनही राष्ट्रपतींनी केले.
21 व्या शतकाचे पहिले दशक हे नवभारताचे आणि नवभारताच्या नवयुवकांचे असेल. आजच्या राष्ट्रबांधणीमध्ये स्वातंत्र्य चळवळीशी नाते धूसर होते आहे. मात्र विश्वास धूसर होत नाही. आधुनिक युवकांकडील तंत्रज्ञानामुळे अधिक अत्मविश्वास निर्माण होतो.
युवकांच्या बळावरच आपण नवभारताचा उदय पाहतो आहोत. लोकशाही अबाधित राखण्यासाठी सामाजिक – आर्थिक उद्दिष्टपूर्तीसाठी घटनात्मक तरतूदींवर ठाम राहिले पाहिजे, याचा पुनरुच्चार राष्ट्रपतींनी केला.
देशाच्या सुरक्षिततेसाठी सरकारने घेतलेल्या निर्णयांचा आढावाही राष्ट्रपतींनी घेतला. निमलष्करी दल, सुरक्षा दल, अंतर्गत सुरक्षा दलांच्या त्याग आणि बलिदानाचे स्मरणही त्यांनी केले. “इस्रो’ने मिळवलेले यश, केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांबाबतही राष्ट्रपतींनी समाधान व्यक्त केले.