चाफळ – अखंड सौभाग्याचं लेणं घेऊन हजारोंच्या संख्येने नऊवारी साड्यांच्या वेशभूषेत स्नेहपूर्वक एकत्र आलेल्या व हळदी- कुंकवाने लालपिवळ्या झालेल्या सुवासिनींनी बुधवारी “तीळगुळ घ्या, गोड गोड बोला’ असे म्हणत श्रीराम मंदिरात मकर संक्रांतीनिमित्त वसा घेतला.
दक्षिण महाराष्ट्रातील असंख्य भाविकांबरोबरच परदेशी पर्यटकांचे आकर्षण ठरलेल्या तीर्थक्षेत्र चाफळला तीनहून अधिक दशकांची परंपरा आहे. तीर्थक्षेत्र चाफळला पर्यटनस्थळाचा “ब’ वर्ग दर्जा प्राप्त झाला आहे. येथील श्रीराम मंदिरात 1985 पासून सीतामाई यात्रेस प्रारंभ झाला. महिलांच्या संख्येत प्रतिवर्षी वाढ होत आहे. नववधूंची त्यात भर पडत आहे. यामुळे या यात्रेस आगळे-वेगळे महत्व प्राप्त झाले आहे. मकर संक्रांतीला सीतामाईचे दर्शन घेऊन तिच्याकडून अखंड सौभाग्याचा वसा घ्यायचा. यामुळे सौभाग्य अखंड टिकते, अशी श्रध्दा आजही महिलांमधून जोपासली जात आहे.
बुधवारी सीतामाई यात्रेसाठी मंदिराच्या आवारात सकाळपासूनच महिलांनी गर्दी केली होती. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास गर्दीत वाढ होत गेल्याने मिळेल त्या ठिकाणी महिला विडे मांडून मनोभावे पूजा करत होत्या. भरजरी काठांची साडी, सुवर्णालंकार, केसात फुलांनी माळलेले सुगंधी गजरे अशा सजलेल्या वेशभूषेत महिला वसा घेण्यासाठी दाखल झाल्या होत्या. सुवासिनींनी प्रथम सीतामाईस ओवाळले.
तसेच एकमेकींना तिळगूळ देऊन आलिंगन दिले. मंदिर परिसरात सर्वत्र सुगड्यांचा खच व हळदी-कुंकवाचा सडा पसरला होता. सीतामाई दर्शनासाठी श्रीराम देवस्थान ट्रस्टने बॅरेकेटस्ची चांगली सोय केली होती. तसेच सीतामाईचे दर्शन शिस्तीने घेता यावे, यासाठी विशेष व्यवस्था केली होती. ठिकठिकाणी मार्गदर्शक बॅनर लावण्यात आले होते. महिलांना ओळीने मंदिरात सोडण्यासाठी श्री समर्थ विद्यालयाचे सव्वाशे आरएसपीचे विद्यार्थी तसेच तीन पोलीस अधिकारी, 25 महिला पोलीस, विभागातील पोलीस पाटील, होमगार्ड यांनी परिश्रम घेतले.
यात्रेसाठी ट्रस्टने केलेल्या योग्य नियोजनाबाबत महिला भाविक व अधिकाऱ्यांनी विशेष समाधान व्यक्त केले. यावेळी उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांच्या मार्गदर्शनाखाली 40 महिला व पुरुष कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. नारळीची बाग याठिकाणी पार्किंगची सोय केली होती. वाहतूक नियंत्रक कक्षाचे पोलीस तसेच बंदोबस्तासाठी 15 विशेष महिला पोलीस होत्या. यात्रा काळात वीज कंपनीचे शाखा अभियंता व कर्मचाऱ्यांनी विद्युत पुरवठा सुरळीत ठेवला होता.
यात्रेत खेळणी, मिठाई, नारळ, तीळगुळ व इतर वस्तूंचे स्टॉल उभारण्यात आले होते. महिलांची वाढती गर्दी लक्षात घेता कराड, पाटण, वाई, वडूज, फलटण, कोरेगाव आगारांतून बसेसची सोय केली होती. वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी कार्यरत होते.
यात्रा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी श्रीराम देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुभाषराव जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वस्त अमरसिंह पाटणकर, मानद सल्लागार अरुण गोडबोले, विश्वस्त भूषण स्वामी, अनिल साळुंखे, एल. एस. बाबर, व्यवस्थापक बा. मा. सुतार, सरपंच सूर्यकांत पाटील, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र कचरे, पोलीस पाटील सागर चव्हाण यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.